सरकार नाही ठिकाणावर, अधिकारी व कर्मचारी बसले डोक्यावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२३
(पाचोरा तालुक्यातील पोलीस विभाग हा इमानेइतबारे काम करत असल्याने पोलीस विभाग वगळता सगळा कारभार रामभरोसे सुरु असल्याचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वीच शासन आपल्या दारी या निमित्ताने स्वता मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीत पाचोरा शहरातील तसेच ग्रामीण भागातील तक्रारी व अडीअडचणी सोडविण्यासाठी पाचोरा शहरातील व्यापारीवर्ग, प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात समस्यांचा पाढा वाचला समस्या समजून घेत जिल्हाधिकारी साहेबांनी तक्रारी नुसार ज्या, त्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देत आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आदेश दिले होते मात्र अद्यापही एकही तक्रारीची चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नसल्याने तालुका पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय अशी शंका निर्माण झाली आहे.)
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून तर आजपर्यंत चढाओढ, फोडाफोडी, पळवापळवी अजून बरेचसे कट, कारस्थान सुरु आहेत. जो, तो आपापल्या पक्षाची बाजू राखत स्वताच चांगभलं करुन घेण्यासाठी जनहितार्थ कार्यक्रमाचा आव आणून मोठमोठ्या सभा आयोजित करत त्या सभेत जनहित बाजूला ठेवून हा नालायक, तो नालायक, ते चोर आम्ही शिरजोर असल्याचा आव आणण्यासाठी एकदम खालच्या थराला जाऊन एकमेकांविरुद्ध तोंडसुख घेत आहेत. वास्तविक पाहता सगळ्यांनी आपापले आत्मपरीक्षण केल्यास एकही धुतल्या तांदळाचा सापडणार नाही असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण सद्यस्थितीत “हम भी नकटे, तुम भी नकटे, सब नकटो का मेला है, एक कोई अलबेला था, वो आज हमारा चेला है. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याचाच फायदा घेत पाचोरा तालुक्यातील काही बोटावर मोजण्याइतके अधिकारी व कर्मचारी वगळे तर सगळीकडे मनमानी कारभार सुरु आहे. गावागावातील ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तलाठी, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी, गुरांचे डॉक्टर हे मुख्यालयात रहात नाही. तसेच ते नियमितपणे दररोज आपापल्या कार्यक्षेत्रात थांबत नाहीत. अधुनमधून आलेच तर ते धुमकेतू सारखे चमकतात व निघून जातात. इतरवेळी भर्व कारभार हाताखाली नेमलेल्या खाजगी पंटरच्या भरवशावर चालतो तर विद्युत वितरण कंपनीचा कारभार झीरो वायरमनच्या भरोशावर चालतो यामुळे ग्रामीण भागातील लोकांना ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, आरोग्य केंद्रात गेल्यावर तेथे कोणीही आढळून येत नाही. यामुळे तलाठी कार्यालयातून उतारा काढणे व इतर कामे होत नाहीत. ग्रामसेवक येत नसल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती, योजनांची माहिती दिली जात नसल्याने व इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी व्यत्यय येत आहे. तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्याने (तो आला म्हणजे ती जाते) या प्रमाणे थोडासाही पाऊस झाला तरी विद्युत पुरवठा खंडित होतो यामुळे ग्रामीण भागातील लोकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
महत्वाचे ~
पाचोरा शहरातील तहसील कार्यालयात सावळा गोंधळ सुरु आहे. रेशनकार्ड धारकांना रेशनकार्ड विभक्त करणे, नाव कमी करणे, नाव वाढवणे, नवीन रेशनकार्ड बनवणे, बारा अंकी क्रमांक मिळवण्यासाठी आठवडे नव्हे तर महिना, महिना चकरा माराव्या लागतात. चकरा मारून सुद्धा पैसे दिल्या, घेतल्या शिवाय वेळेवर काम होत नाही अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, विधवा परित्यक्ता महिलांसाठीच्या योजना, दिव्यांग विकलंगांच्या सोयी, सवलती मिळवून घेण्यासाठी पैसे दिल्या घेतल्याशिवाय काम होत नाही असे खात्रीलायक होत आहे.
भूमी अभिलेखा कार्यालयात कोणतेही कर्मचारी वेळेवर मिळून येत नाहीत मिळून आल्यास तर ते वेळेवर काम करत नाहीत विशेष म्हणजे काही कागदपत्र घ्यायचे असल्यास शंभर रुपयाच्या पुढेच बोली बोलली जाते पैसे न दिल्यास कागदपत्रे सापडत नाही उद्या या, परवा या, बघू, करू अशी उत्तरे मिळतात यामुळे “गरजवंताला अक्कल थोडी” याप्रमाणे सरते शेवटी शंभर रुपयापासून तर पाचशे रुपये दिल्याशिवाय काम होत नाही. मात्र पाचोरा तालुक्यातील पोलीस विभाग वगळता सगळा कारभार रामभरोसे सुरु असल्याचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत आहे.
हा सगळा गलथानपणा सुरु होण्यामागचे एकमेव कारण म्हणजे सरकारच ठिकाणावर नसल्याने त्यांना कुणाचाही धाक राहिलेला नसल्याने पोलीस विभाग वगळता सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना व गरजूंना चांगल्याप्रकारे वागणूक देत नसून उडवाउडवीची उत्तरे व चालढकल करत आहेत. व बऱ्याचशा कार्यालयात देवाणघेवाण केल्या शिवाय कोणत्याही प्रकारची कामे होत नसल्याने (सरकार नाही ठिकाणावर, अधिकारी व कर्मचारी बसले डोक्यावर.) असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.