केळीचे वजन करतांना तीन किलोची कट्टी लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर लवकरच कारवाई, डॉ. निळकंठ पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२३
आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी राजा आहे, असे म्हटले तर परंतु या कृषीप्रधान देशात खरच शेतकरी सुखी आहे का ? याचा विचार केला तर नक्कीच आज शेतकरी फक्त आणि फक्त मातीत राबणाऱ्या बैला सारखा राब, राब राबतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कारण शेतीसाठी लागणारे बि, बियाणे, खते, किटकनाशके व शेती उपयोगी साहित्य यांची किंमत छापील स्वरुपात येते व त्या किंमतीत शेतकऱ्यांना लागणारे बि, बियाणे, खते, किटकनाशके व इतर वस्तू खरेदी केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच दरवर्षी बाजारात नकली बियाणे, नकली खते, किटकनाशके हे बिनधास्तपणे विकली जातात. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ऐन पेरणीच्या दिवसांत बी, बियाणे व खतांची कृत्रिम टंचाई भासवून ते मागच्या दाराने जास्त भावाने विक्री करुन गरजू शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या आर्थिक लुट केली जाते व शेतकरीही या गोष्टीला बळी पडतो कारण वेळेवर पेरणी नाही झाली तर त्याचे वर्षभराचे गणित बिघडते म्हणून घरातील एखादी व्यक्ती ऐन पेरणीच्या दिवसांत दगावल्याची “प्रेती झाकून” पेरणी करणारा हा शेतकरी खरच जगाचा पोशिंदा व राजा आहे का ? हा प्रश्न, प्रश्नच राहुन जातो हे मात्र तेवढेच खरे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव ठरवणे हे पुर्णपणे व्यापारी व दलालांच्या हातात आहे. त्यांच्या मनमानी पद्धतीने शेतमालाचे भाव ठरले जातात यात सत्ताधारी काहीच हस्तक्षेप करत नाहीत किंवा हमी भाव जाहीर करुन शासकीय खरेदी केली जात नसल्याने शेतकऱ्याच पांढर सोन म्हणून जाणाऱ्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही कापूस घरात पडून आहे.
या विविध समस्या डोक्यावर घेऊन शेतकरी आपला शेतमाल जेव्हा विकायला बाजारात नेतो तेव्हा व्यापारीवर्ग धान्य असो, कापूस असो वा केळी असो हा शेतमाल मोजून घेतांना विविध बहाणे करुन मोजलेल्या शेतमालाच्या एकुण वजनातून कट्टी (कपात) करून उर्वरित वजनाचे पैसे देतो. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे अन्याय ठरत आहे. असाच काहीसा प्रकार केळी पिका बाबत होत असून केळीचे व्यापारी केळी मोजून घेताना प्रत्येक क्विंटल मागे तीन किलो वजनाची घट म्हणजेच (कट्टी) लावून घेत असल्याने शेतकऱ्याला शंभर किलोमागे तीन किलोची घट सहन करावी लागत आहे.
याबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन संचालक डॉ. मा. श्री. निळकंठ पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देऊन पाचोरा बाजार समितीच्या माध्यमातून केळीचे वजन माप करतांना इलेक्ट्रॉनिक काट्यावर कधी तांत्रिक बिघाड तर कधी हातसफाई करुन मापात पाप करत असून प्रती क्विंटल तीन किलो (कट्टी) लावणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीने समज द्यावी, अशी मागणी निवेदनात केली असून या निवेदनावर चाळीस केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
या निवेदनाची दखल घेत मापात पाप करणाऱ्या तसेच प्रतिक्विंटल तीन किलो कट्टी लावणाऱ्या व्यापाऱ्यांना योग्य ती समज देऊन हा गैरप्रकार रोखण्यासाठी आम्ही बांधील आहोत असे आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. मा. श्री. निळकंठ पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.