पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात परप्रांतीय फेरीवाल्यांचा धुमाकूळ व भुरट्या चोऱ्यांचे वाढते प्रमाण संशयाच्या भोवऱ्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२३
पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात विविध संसारपयोगी वस्तू, कपडे, साड्या, स्वेटर, चादर, शाल, घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच आयुर्वेदिक औषधे विक्री करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाले मोठ्या संख्येने फिरतांना दिसून येत आहेत. हे परप्रांतीय फेरीवाले व्यवसायीक खेड्यापाड्यातील गाव, वस्तीच्या गावात सकाळपासून तर भर दुपारी व संध्याकाळपर्यंत फिरत असतात. हे फेरीवाले आपल्या जवळील वस्तू विक्री करतांना विशेष करुन दुपारच्या वेळी गावात प्रवेश करतात कारण भर दुपारी खेड्यापाड्यातील लोकांचा व्यवसाय शेती असल्यामुळे ते शेतात असतात याच संधीचा फायदा घेऊन हे फेरीवाले महिलांना विश्वासात घेऊन आपल्या जवळील कमी किमतीच्या तसेच बनावट कपडे व वस्तू विकून फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर येत असून यात काही फेरीवाल्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला असता त्यात संशयास्पद वागणूक दिसून येत असल्याचे काही जाणकार महिलांनी सांगितले आहे.
एका बाजूला जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात विविध प्रकारच्या वस्तू व कपडे विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या संखेत कमालीची वाढ झाली असून दुसरीकडे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने या फेरीवाल्या व्यवसायीकांपैकी काही फेरीवाले दिवसा गावातून फिरुन स्थळ निरीक्षक (रेखी) करुन त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत चोऱ्या घडवून तर आणत नाहीत ना असा संशय सुज्ञ नागरिक व महिलावर्गातून व्यक्त केला जात असल्याने गावागावातून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.
म्हणून तालुकास्तरावरीय जबाबदार अधिकारी व कर्मचारी तसेच ज्या, त्या परिसरातील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लवकरात, लवकर
पोलीस पाटील व ग्रामपंचायतीचे सरपंच यांची संयुक्त बैठक घेऊन आपापल्या गावात येणाऱ्या फेरीवाल्या व्यवसायीकाचे ओळखपत्र म्हणजे (आधारकार्ड, निवडणूक कार्ड किंवा शासनमान्य ओळख पत्र) याची शहानिशा करुन तशी दप्तरी नोंद करुन मगच गावात व्यवसायानिमित्त भटकंती करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे म्हणजे खरे व्यवसायीकच गावात व्यवसाय करण्यासाठी गावात येतील किंवा याच काळात काही चोरी, दरोड्याच्या घटना घडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावता येईल असे मत सुज्ञ नागरीकांनी व्यक्त केले आहे.
*******************************************************************
महत्वाचे ~ बाहेर राज्यातील फेरीवाल्यांच्या नोंदी बंधनकारक कराव्यात
*******************************************************************
परप्रांतीय फेरीवाले हे गृप मिळून तालुक्याच्या ठिकाणी किंवा खेड्यापाड्याच्या जवळपास असलेल्या मोठ्या शहरात भाड्याने खोली घेऊन किंवा एखाद्या लॉज किंवा हॉटेलमध्ये मुक्कामाला रहातात अश्या फेरीवाल्यांची शहानिशा करुन ओळख पटवण्यासाठी योग्य ती कागदपत्रे घेऊन त्यांना घर किंवा खोली भाड्याने द्यावी तसेच लॉज व हॉटेल व्यावसायिकांनी या परप्रांतीयांच्या ओळखीचे पुरावे घेऊनच त्यांना थांबायला परवानगी द्यावी व ही परवानगी दिल्यानंतर यांच्या नोंदी घेऊन जवळच्या पोलीस स्टेशन, पोलीस चौकी किंवा जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात ही माहिती पुरवणे क्रमप्राप्त आहे. मात्र आजही पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी, जामनेर तालुक्यासह जळगाव या मोठ्या शहरात बरेचसे परप्रांतीय फेरीवाले मोठ्या संख्येने थांबले आहेत यापैकी बऱ्याचशा प्रमाणात यांच्या नोंदी, ओळखपत्र न घेता व संबंधित पोलीस स्टेशनला न कळवता जागा मालक व लॉज मालक फक्त पैसा कमावत असल्याने अशा बेफिकीर कारभारामुळे काही गुंड प्रवृत्तीचे लोक विविध प्रकारे ओळख लपवून चोऱ्या घडवून आणत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा परप्रांतीयांच्या नोंदी न ठेवणाऱ्या जागा मालक, लॉज व हॉटेल मालकांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
असे केल्याने चांगल्या इमानेइतबारे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना नहाकच मनस्थाप होणार नाही. लबाडांचा वेळीच बंदोबस्त करता येईल हे मात्र नक्की.