पाचोरा वनविभागाची अशीही खुबी, चोरांच्या हातात दिली चाबी. सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई करावी निसर्गप्रेमींची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२४
पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला मात्र अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी चिपकुन बसलेले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विरप्पनच्या पिल्लावळी सोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने यांच्या विरोधात कडक कारवाई केली जात नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून या वृक्षतोडीमुळे दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची स्वयंचलित यंत्राच्या साह्याने विनापरवाना दिवसाढवळ्या, राजरोसपणे कत्तल केली जात आहे. अगोदर निसर्गाचा समतोल ढासळत चालला याची दखल घेत मागील महिन्यात भोजे येथील समाजसेवक निलेश उभाळे यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिल तसेच जामनेर तालुक्यातील बिलवाडी रस्त्यावर व काही ठिकाणी उघड्यावर पडलेल्या लाकुड साठ्याचे मोजमाप करुन लाकुड साठा जप्त केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र या लाकुड साठ्याचे मोजमाप झाल्यावर हे लाकुड उघड्यावर पडले असल्यामुळे तसेच ज्याच्या मालकीचे हे लाकुड आहे त्यालाच लक्ष ठेवण्यासाठी सांगितले असल्याने वन विभागाकडून चोराच्या हातात चाब्या दिल्याचा प्रकार घडला आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास आम्ही मारल्यासारखे करु तुम्ही पडल्यासारखे करा असा गोरखधंदा आजही सुरु असल्याने आजही दररोज शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. तसेच या उघड्यावर पडलेल्या लाकुड साठ्याचे मोजमाप करुन जरी ते तब्यात घेतले असले तरीही याच्या देखभालीसाठीची जबाबदारी लाकुड वखार मालक व लाकुड व्यापाऱ्यांकडे सोपविण्यात आली असल्याकारणाने या लाकडांची चोरी होऊ शकते अशी शंका निर्माण झाली असल्याने हा अवैध लाकुड साठा योग्य ठिकाणी नेऊन संबंधित लाकुड व्यापारी व वखार मालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी निसर्ग प्रेमींनी केली आहे.