अग्रीम पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या कर्मचाऱ्याची कोणक्रॉस कंपनीकडून हकालपट्टी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१०/२०२३
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक रुपयात अग्रीम पिक विमा योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने एक रुपया भरुन आपल्या शेतमालाचा पिक विमा काढून घेतला आहे. तदनंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाचे अतोनात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या २५% टक्के अग्रीम रक्कम नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
ही २५% नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी संबंधित पिक विमा कंपनीकडून झालेल्या नुकसानीचा ऑनलाईन पद्धतीने पंचनामा करणे गरजेचे असल्याने ओरिएंट कंपनीकडून काही कंपन्यांना कॉन्ट्रॅक पध्दतीने कामे देण्यात आली आहेत. याच माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करुन देण्यासाठीचे पाचोरा तालुक्यातील कामाचा ठेका कोणक्रॉस कंपनीचे ठेकेदार प्रशांत शेजवळ यांनी घेतला असून संपूर्ण पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे फोटो काढून सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील काही तरुणांना रोजंदारीवर कामावर ठेवले होते.
परंतु हा पंचनामा करुन घेतांना रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना भुलथापा मारुन तुमचे पाहिजे तेवढ्या प्रमाणात नुकसान झालेले नाही तरीही आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देतो असे सांगून प्रत्येक शेतकऱ्यांकडून ५००/०० ते १५००/०० रुपये घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात फोटो काढून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असल्याचा प्रकार काही शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूज कडे संपर्क साधुन कळवला होते. या शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेत सत्यजित न्यूजच्या माध्यमातून [आगीतून निघून फुफाट्यात पडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे फोटो काढून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाचशे ते हजार रुपये घेणारे ते कोण ?] या शीर्षकाखाली काल वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
हे वृत्त प्रकाशित होताच या वृत्ताची दखल घेत ओरिएंट कंपनीकडून काम घेतलेले ठेकेदार कोणक्रॉस कंपनीचे संचालक प्रशांत शेजवळ यांनी सत्य परिस्थिती जाणून घेत शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करत संबंधित रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने घेतलेल्या पैशाशी आमचा कवडीचाही संबंध नाही असा खुलासा त्यांनी स्वता त्यांनी सत्यजित न्यूज कडे केला आहे. तसेच अजूनही पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचा सर्हे आमच्या कोणक्रॉस कंपनीकडून सुरु असून आमचा प्रतिनिधी तुमच्या शेतात आल्यावर त्याला फक्त नुकसान झालेल्या पिकाची माहिती भरुन द्यावी व कुणीही पैश्याची मागणी केल्यास थेट आमच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रशांत शेजवळ केले आहे.
असे असले तरी ज्या, ज्या शेतकऱ्यांचे पैसे घेण्यात आले आहेत ते, ते शेतकरी आमचे पैसे परत न मिळाल्यास आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.