प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढीला भरणार भक्ताचा मेळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनांक २९ जून २०२३ गुरुवार रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने यात्रा यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होता म्हणून दोन वर्षे यात्रोत्सवात खंड पडला होता. कोरोनाच्या संकटातून आपण बचावलो ही भगवान विठ्ठलाची व विठ्ठल भक्त श्री. गोविंद महारांची कृपा म्हणावी लागेल म्हणून यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात आषाढी एकादशीला यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेले पिंपळगाव हरेश्वर हे गाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते कारण यामागील आख्यायिका अशी आहे की एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावातील झेंडुला पाटील व काशीबाई पाटील या सर्वसामान्य कुटुंबात सन १७८५ मध्ये श्री. विठ्ठल भक्त गोविंद महाराजांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच श्री. गोविंद महाराजांना विठ्ठल नामाचे खुप वेड लागले होते. ते भगवान विठ्ठलाचे अस्सिम भक्त होते. ते वयाच्या आठव्या वर्षापासून नियमित विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूला जात असत वयाच्या दहाव्या वर्षी सुध्दा गोविंद महाराज नियमितपणे पंढरपूरच्या वारीला गेलेले होते. यावेळी विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करत असतांनाच महाप्रवेशद्वारात झालेल्या गर्दीत एक महिला मरण पावली होती. यावेळी गोविंद महाराजांनी आपल्या भक्तीच्या साधनेतून भगवान विठ्ठलाला प्रसन्न करुन घेत त्यांना साकडे घातले की तुझ्या दरबारात तुझ्या दर्शनासाठी आलेल्या भक्त महिलेवर अशी वेळ का यावी अशी विचारणा केली यावेळी गोविंद महाराजांच्या निर्मळ भावभक्तीला पाहून विठ्ठल महाराजांनी त्या मृत महिलेला जिवंत केले गोविंद महाराजांना सांगितले की तु यापुढे गर्दीत मला भेटायला येऊ नकोस तर मी आषाढी एकादशीला तुला भेटायला येईल आणि तेव्हापासून भगवान विठ्ठल हे आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी १२ वाजता पिंपळगाव हरेश्वर येथे गोविंद महाराजांच्या भेटीसाठी येतात व यावेळी विठ्ठल पंढरपूरातील मंदिरात नसतात म्हणून दुपारी १२ वाजता पंढरपूरातील मंदिराचे दार बंद केले जाते असे मानले जाते म्हणून दुपारी यावेळी गोविंद महाराजांच्या मंदिरात महापूजा करुन आरती म्हटली जाते.
तेव्हा पासून गोविंद महाराजांनी भगवान विठ्ठलाच्या भक्तीत आपले जीवन समर्पित करुन विठ्ठल नामाचा गजर करत महाराष्ट्रात वारी घेऊन फिरतांना भाविक, भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी जामनेर, उत्राण, पाळधी (पहूर) येथे विठ्ठल मंदिर बांधले व जामनेर, उत्राण, शेंदुर्णी, पिंपळगाव हरेश्वर येथे रथोत्सव सुरु केला ही परंपरा आजतागायत अखंडपणे आजही सुरु आहे. तसेच त्यांनी बालवयापासून तर वयाच्या ४० वर्षांपर्यंत विठ्ठलाची मनोभावे आराधना केली याच कालावधीत
त्यांनी ६५ अध्यायातून गोविंद चरित्र लिहिले व हे करत असतांनाच पिंपळगाव हरेश्वर गावाच्या पूर्वेला असलेल्या बहुळा नदी काठावर त्यांनी जीवंतपणी समाधी घेतल्यानंतर भाविक, भक्तांनी त्याच जागेवर भव्य असे गोविंद महाराजांचे मंदिर बांधले आहे.
हे भव्यदिव्य मंदिर बांधतांना ६५ बाय ६५ चौरस फूट या मंदिराला ६५ चौक्या, ६५ कलश घेतले आहेत या ६५ संख्या घेण्यामागचे कारण म्हणजे गोविंद महाराजांनी ६५ अध्यायातून गोविंद चरित्र लिहिले आहे. मंदिराच्या पूर्वेला २५ बाय ५० फुटांचे भव्य सभागृह व एक रंगमंच आहे व महाराजांच्या समाधीच्या दक्षिणेकडे पांडुरंग महाराजांची समाधी असल्याने गोविंद महाराज व पांडूरगाचे दर्शन एकाच ठिकाणी घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून येते.
अश्या प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे उद्या दिनांक २९ जून २०२३ गुरुवार रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रोत्सवात महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक, भक्त हजारोंच्या संख्येने सहभागी होतात म्हणून यांच्या सेवेसाठी गोविंद महाराज संस्थानचे पदाधिकारी, पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळी व पिंपळगाव हरेश्वर गावातील समाजसेवक यांच्यामार्फत यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी चहा, पिण्याचे शुद्ध पाणी व फराळाची मोफत व्यवस्था करतात व यात्रेत रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी उभे राहून दिवसभर भाविक, भक्तांना सुविधा उपलब्ध करून देत असतात.
******************************************************
“यात्रेत कुणीही गोंधळ घालून विनाकारण कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही. तसेच महिलांनी यात्रेत येतांना किंमती वस्तू, दागदागिने सोबत आणू नये असे आवाहन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांनी केले आहे.)
*******************************************************
(या यात्रोत्सवात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनतर्फे ठिकठिकाणी पोलीस चौकी उभारुन यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शन व मदत कार्य केले जाते व यात्रेत कुठेही खिसा, पाकीट, दागदागिने व इतर वस्तू चोरी होणार नाही तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी जास्तीचे पोलीस तैनात करुन काटेकोरपणे कडक बंदोबस्त ठेवण्यात येतो याकरिता या अफाट गर्दीत पोलीसांना दिवसभर तारेवरची कसरत करावी लागते.)