आळंदी येथे पोलिसांकडून वारकऱ्यांना झालेल्या मारहाणीचा पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२३
महाराष्ट्रभरातून हजारो वारकरी बांधव दिंडी काढून
पंढरपूर व आळंदीला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे. वारकरी बांधव दिंडी घेऊन पंढरपूर व आळंदीकडे प्रस्थान करतांना पावलोपावली विठ्ठल नामाचा गजर करत गावावात मुक्काम करुन मुक्कामाच्या ठिकाणी भजन कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. या दिंडीत सर्वच जाती धर्मातील लोक सहभागी झालेले असतात रस्त्याने जातांना हे वारकरी बांधव शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत असतात.
अशाच या शिस्तप्रिय वारकरी संप्रदायाच्या बाधवांवर आळंदी येथे पोलिसांकडून अमानुषपणे लाठी चार्ज केला गेला लाठी चार्ज करतांना निर्दयपणे मारठोक झाली यात शेकडो वारकरी बांधव जखमी झाले या घटनेचा निषेध करण्यासाठी पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला. दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अश्या मागणीचे निवेदन तहसिलदार प्रविण चव्हाण यांना देण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, तालुका अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, बाजार समितीचे संचालक विजय पाटील, शांताराम चौधरी, अशोक सोनवणे, हरिष पाटील, अॅड. अविनाश सुतार, सत्तार पिंजारी, बाबाजी ठाकरे, शेख अन्वर शेख शब्बीर, सतिष देशमुख सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शांततेत चाललेल्या दिंडीला गालबोट लावून वारकरी संप्रदायाला मुद्दामहून त्रास देण्यासाठी ज्याचा वारकरी संप्रदायाशी कवडीचाही संबंध नाही असा कुणीतरी भोसले नावाचा नकली भक्त दिंडीत घुसून धुडगूस घालत दिंडीत हस्तक्षेप करतो ही अतिशय निंदनीय, अशोभनीय बाब असल्याचे मत व्यक्त करत ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचणारी गंभीर बाब असल्यावरही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे या घटनेबाबत थातुरमातुर उत्तर देऊन एक प्रकारे समर्थन करतात ही सरकारसाठी लांच्छनास्पद बाब असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत असे सांगून या घटनेची सखोल चौकशी करून वारकरी बांधवांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांना त्वरित निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.