शिंदाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर पाटील अनंतात विलीन.
दिनांक~१२/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील माजी सरपंच स्व. विश्वनाथ लुकडू पाटील. (आण्णासाहेब) यांचे नातू, माजी सरपंच स्व. अशोक विश्वनाथ पाटील. यांचे लहान सुपुत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांचे आज दिनांक १२ जून २०२३ सोमवार रोजी सकाळी ठिक ०२ वाजून १० मिनिटांनी अल्पशा आजाराने नाशिक येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
‘स्व. डॉ. मयुर पाटील यांच्याबद्दल दोन शब्द’
डॉ. मयूर पाटील हे पाटील कुंटुबातील एक आगळवेगळ व्यक्तीमत्व बालपण गावात गेल्यामुळे लहानपणापासूनच खेळकर व मनमिळाऊ स्वभावामुळे सगळ्यांना हवाहवासा वाटणारा मयुर यांचा जन्म सोमवार रोजी झाला असल्याने सगळे डॉ. मयुर यांना भोला या टोपणनावाने हाक मारत असत. सहा फूट उंच बांधा, सुदृढ, निरोगी शरीर, तल्लख बुद्धी, अनोळखी स्मरणशक्ती व विशेष म्हणजे खेळाडू वृत्ती असल्याने ते कायम क्रिकेट खेळ खेळत असत. क्रिकेटच्या मैदानावर लहान, लहान मुलांपासून तर तरुणांसोबत क्रिकेट खेळतांना ते नवीन खेळाडूंना क्रिकेटच्या नियमांचे धडे देत असत.
स्वता शिक्षण घेत असतांनाच सोबतच्या मित्रांना तसेच गावातील लहान,थोर, तरुणांच्या अभ्यासाकडे ते लक्ष ठेवून होते. स्पर्धा परीक्षा असो व दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असो यात यशस्वी होण्यासाठी ते गावातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करत असत. तसेच अभ्यासिकेत ते स्वता लक्ष देऊन मुलांकडून अभ्यास करुन घेत असत. स्व. मयूर पाटील शिंदाड गावातील मुलांसाठी एक चालत, फिरत माहिती केंद्र व एक शब्दकोश होते. मुलांना आभ्यासात काही अडचणी आल्यास डॉ. मयुर पाटील दिसल्यावर ते त्यांना विचारुन घेत असत. बाहेर गावी गेल्यावर तेथुन वृत्तपत्र आणून त्यातील नोकरी विषयक जाहिराती होतकरु तरुणांना दाखवून ते त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन करत असत.
स्वता वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शासकीय नोकरी स्वीकारली तरीही त्यांची गावाकडील ओढ कमी होऊ दिली नाही. निसर्गाविषयी त्यांना खुप आवड होती. म्हणून ते सतत वृक्ष लागवड, वृक्ष संगोपनासाठी झटत असत. गाव शिवारात व शेत शिवारात फिरतांना ते कायम आपल्या खिशात वेगवेगळ्या झाडांच्या बिया घेऊन फिरत असत व त्या बिया नद्या, नाले, अडचणीच्पया ठिकाणी, पडिक जमिनीवर, पानंद रस्त्यावर लागवड करत असत. तसेच वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृती करत असत.
त्यांना सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यातून जातीय सलोखा निर्माण करुन जनजागृती करत असत. याकरिता ते नवरात्रोत्सव, श्री. गणेशोत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजातील एकोपा निर्माण करण्यासाठी सतत झटत होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन करुन समाजातील वाईट रुढी, परंपरा कशा पद्धतीने थांबवता येतील याकरिता ते सतत प्रयत्नशील होते.
तसेच कोरोनाच्या कालावधीत त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून वैद्यकीय सेवा बजावतांना स्वताच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून लांब राहून अहोरात्र मेहनत घेऊन कोरोना बाधितांच्या उपचारासाठी स्वताला झोकून दिले होते. अधुनमधून घरी गावाकडे आल्यावर गावातील लोकांशी संवाद साधून कोरोना बाबतीत असलेले गैरसमज दूर करुन नियमावली समजून सांगत जनतेच्या मनातील भिती दूर करण्यासाठी प्रयत्न करत सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत जनजागृती करत होते.
आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदात्त हेतू मनात ठेवून डॉ. मयूर पाटील यांनी त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शिंदाड गावात १० मे रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराच्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेकडो गरजूंना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत होते. शासकीय योजनांची माहिती देत त्या योजनेनुसार गरजूंना योग्य ऑपरेशन व इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत असत. हे करतांना त्यांनी कधीही कोणाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही.
याच कालावधीत डॉ. मयूर यांना च्या आजाराने ग्रासले होते. म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपल्या मुळ गावी शिंदाड येथे स्वताचा दवाखाना सुरु करत आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता. शिंदाड गावात डॉ. मयूर पाटील यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्यापासून शिंदाड गावातील गोरगरीब जनतेसाठी हा दवाखाना वरदान ठरला होता. कारण कुणाला काहीही व्याधी जाणवल्यास संबंधित रुग्ण सरळ डॉ. मयूर पाटील यांच्या दवाखान्यात येऊन उपचार करुन घेत असत कारण डॉ. मयूर पाटील यांनी गोरगरीब, मजूर वर्गाकडून कधीच पैशाची मागणी केली नाही.
“दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा”
अलिकडे सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते शिंदाड या आपल्या मूळगावीच प्रँक्टिस करीत होते. जनसेवा करत असतांनाच डॉ. मयूर पाटील यांनी मात्र स्वताच्या प्रकृतीकडे कमालीचे दुर्लक्ष केले असावे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण डॉ. मयूर पाटील यांनी स्वताच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत दिवसभर रुग्ण सेवा केली हे करत असतांनाच दुपारी पावणे चार विजेच्या सुमारास थाँयराडच्या व्याधीने अचानकपणे उग्र रुप धारण केले. हे लक्षात येताच एकच धावपळ सुरु झाली. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यासाठी ठरले लगेचच वाहनाची व्यवस्था करण्यात आली व मुंबईकडे जाण्यासाठी निघाले मात्र नियतीला ते मान्य नसावे म्हणून की काय डॉक्टर मयूर पाटील यांची प्रकृती वाटेतच बिघडल्याने मध्येच नाशिक येथे थांबून उपचार घेण्याचे ठरले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता याच कालावधीत डॉक्टर मयूर पाटील यांची प्राणज्योत मालवली शेवटी म्हणतात ना “पराधीन आहे पुत्र मानवाचा” असे म्हणून आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागते आहे.
“जो आवडे सगळ्यांना, तोची आवडे देवाला”
शिंदाड ग्रामस्थांच्या वतीने स्व. डॉ. मयूर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शब्दांकन
मा. श्री. पी. पी. पाटील.(सर)
शिंदाड ता. पाचोरा. जिल्हा. जळगाव.