पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार वृक्षांची कत्तल, वनविभाग बेदखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२१
(पाचोरा वनविभागाचे अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करुनही ते प्रतिसाद देत नसल्याचे अनुभव बऱ्याचशा निसर्गप्रेमींना येत असल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या आहे.)
पावसाळा संपतोन न संपतो तोच पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळ (लाकुड व्यापारी) सक्रिय झाली असून मागील एक महिन्यापासून या विरप्पनच्या पिल्लावळीने तिघेही तालुक्यात धुमाकूळ घातला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून या तिघेही तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटून आर्थिक प्रलोभने दाखवत हिरव्यागार, डेरेदार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करत बिनधास्तपणे वाहतूक करत आहेत. म्हणून लाकूड व्यापाऱ्यांसह संबधित शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे
एका बाजूला शासन वृक्षतोड थांबावी म्हणून घराघरात उज्वला योजनेअंतर्गत मोफत स्वयंपाकाचा गॅस पुरवत असून, दरवर्षी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनासाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे. तर दुसरीकडे लाकूड व्यापारी व वनविभागाच्या संगनमताने दररोज शेकडो वृक्षांची कत्तल होत असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. सततच्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत असून कधी उन्हाळ्यात पावसाळा तर कधी पावसाळ्यात उन्हाळा, कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरीसुद्धा सगळीकडे बिनधास्तपणे वृक्षतोड सुरू असल्याने निसर्गाचा समतोल बिघडल्यास भविष्यात अजूनही कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल असे मत सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे.
तसेच सगळीकडे प्रगतीच्या नावाखाली व मानव वस्ती झपाट्याने वाढत असल्याने खेडेगावासह मोठ्या शहरांच्या आसपासची हजारो एकर शेत जमीनीचे बिगर शेतीत रूपांतर होऊन त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण, दररोज रस्त्यावर धावणारी कोट्यवधी स्वयंचलित वाहने या वाहनातून निघणारा कार्बनडाय ऑक्साईड वातावरणात मिसळत आहे. तसेच मोठमोठे कारखाने, उद्योग, मोठमोठे प्रकल्प ही विकास कामे करणे गरजेचे आहे. परंतु हे करतांना अटी,शर्ती प्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे तेवढेच गरजेचे आहे. परंतु फक्त कागदोपत्री पूर्तता केली जाते. प्रत्यक्षात मात्र करारनाम्यानुसार कुठेही वृक्ष लागवड केली जात नसल्याचे दिसून येते. या कारणास्तव अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व बाबींचा विचार केल्यास वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून ओझोन वायूचा स्तर कमी होत आहे. ऑक्सिजनची हा वायू किती महत्त्वाचा आहे, हे कोरोनाची लागण झाल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. जर सगळ्यांना आपले व आपल्या भावी पिढीचे आयुष्य निरोगी व दीर्घायुष्यी करायचा असेल तर नक्कीच वृक्ष लागवडी शिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून वेळेवर जागे होऊन अनाधिकृतपणे होणारी वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमींना कडून केली जात आहे.
(वेळीच जागे व्हा निसर्ग वाचवा अन्यथा भविष्यात निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे अनेक भिषण संकटांशी सामना करावा लागेल व भविष्यात ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर बांधण्याची वेळ येईल यात शंकाच नाही.)