पन्नांश्या व म्हसळा धरणातून पाणी चोरी सुरुच, तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या कोकडी तांडा गावाजवळ म्हसाळा (कोकडी) तसेच कुऱ्हाड येथून जवळच असलेल्या पन्नांश्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केली जात आहे. यामुळे कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द व अंबे वडगाव गावच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने अगोदरच धरण, पाझर तलाव जलसाठा अत्यंत कमी आहे. तसेच पावसाळा कमी झाल्यामुळे या वर्षी नद्या, नाले कोरडेठाक झाल्यामुळे धरण व पाझर तलाव पाण्याची आवक नव्हती म्हणून धरण व पाझर तलाव पुर्णपणे भरले नव्हते तसेच पावसाळा संपताच आसपासच्या शेतकऱ्यांनी शासनाची तसेच विद्युत वितरण कंपनीची कोणतीही अधिकृत परवानगी न घेताच धरण व पाझर तलावातून पाणी चोऊ सुरु केली आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला तरीही पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीमचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे अर्थपूर्ण डोळेझाक केली आहे असा आरोप सुज्ञ नागरिक केला आहे.
कारण आत्ताच्या परिस्थितीत पन्नांश्या व म्हसळा म्हणजे कोकडी धरणात अत्यंत कमी म्हणजेच मृत जलसाठा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. असे असले तरी आजही या दोघ धरणातून पाणी चोरी सुरु आहे. विशेष म्हणजे पाणी चोरी करण्यासाठी संबंधित शेतकरी हे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून विद्युत चोरी करुन पाणी चोरी करतांना दिसून येतात ही पाणी चोरी अशीच सुरु राहिल्यास येत्या काही दिवसातच कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक व अंबे वडगाव गावातील लोकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल तसेच आसपासच्या दहा खेड्यापाड्यातील पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे याची दखल घेऊन या दोघीही धरणातून होणारी पाणी चोरी तसेच विद्युत चोरी करणारांवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
आर्थिक साटेलोटे आणि राजकीय हस्तक्षेप.
वरील दोघे धरणांसह पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा धरण व पाझर तलावातून शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता दिवसाढवळ्या, राजरोसपणे पाणी चोरी सुरु आहे. ही पाणी चोरी करण्यासाठी विद्युत चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. असे असले तरी संबंधित पाटबंधारे, लघु पाटबंधारे व विद्युत वितरण कंफनीचे अधिकारी व कर्मचारी हा नंगानाच उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. यामागील कारण जाणून घेतले असता पाटबंधारे विभागाचे व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी या गैरप्रकाराकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच काही ठिकाणी या पाणी व विद्युत चोरी करणारांना राजकीय पाठिंबा मिळत असल्याने यांच्या विरोधात कुणीही कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याने हा प्रकार असाच सुरु राहीला तर येत्या काही दिवसातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.