ओला दुष्काळ जाहीर करावा, ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य भडगावचे अध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१०/२०२१
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा, भडगाव तालुक्यात मागील आठवड्यात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक हातचे गेले आहे. तसेच उडीद, मूग व इतर कडधान्य व सोयाबीन, मका, ज्वारी बाजरी ही पिकेही हातची गेली आहेत.
शेतकऱ्याच्या शेतातील पिके त्यांच्या डोळ्यासमोर होत्याची नव्हती झाल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले असून हंगाम आल्यानंतर दोन पैसे हातात येतील ही स्वप्ने ही नष्ट झालेली पिके पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू रुपाने वाहून गेली आहेत.
मागील वर्षापासून कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत, करत अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांने कर्ज काढून घरातील दागदागिने मोडून बि,बियाणे,खते घेऊन राबराब राबून जुन महिन्यापासून जिवापाड जपली ती या अतिवृष्टीमुळे नष्ट झाले आहेत. आता तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन जीवदान द्यावे अन्यथा मेटाकुटीला आलेल्या हतबल शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल होईल असे सांगत ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य भडगाव कार्यकारणीच्या वतीने अध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील यांनी व त्यांच्या सदस्यांनी मागणी करत या मागणीचे निवेदन तहसीलदार मा.श्री. मुकेश हिवाळे साहेब भडगाव यांना दिले आहे.
ओल्या दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन देतांना मोहन पाटील महिंदळे, सुनिल वंजारी पळासखेडे, कमलाबाई देसले सावदे, पूजा विकास पाटील वलवाडी, सुरेखा पाटील, अजय महाजन पिंपरखेड,शोभाबाई पाटील आमडदे, विजय पाटील पांडरद, समाधान पाटील वडजी,दिपाली पाटील बोदर्ड़े, दिव्या पाटील महिंदळे, नकुल पाटील, वंदना बडगुजर,सुरेखा सुधाकर पाटील वडजी,ज्योती पाटील वाक व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.