पाचोरा तालुक्यातील संशयित राईस मिल व स्वस्त धान्य दुकानदारांच्या चौकशीसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२४
पाचोरा, भडगाव ताल्युक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे तसेच पुरवठा व वितरण विभागाच्या छुप्या आर्शिर्वादाने गोरगरिबांना अल्पदरात व मोफत धान्य वाटप योजनेत मोठा गोंधळ सुरु असून हे गोरगरिबांसाठी येणारे धान्य काळाबाजार जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही सुज्ञ नागरिक लवकरच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्रालय, मंत्रालय कॅबिनेट सचिवालय, मुंबई यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगचे धान्य वाटप करतांना मोठ्या प्रमाणात घोळ सुरु आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता मान्यताप्राप्त स्वस्त धान्य दुकानदार हे मनमानी पद्धतीने वागत असून रेशनकार्ड धारकांना धान्य देतांना पुरेसे धान्य देत नाहीत. तसेच धान्य वाटप करतांना लाभार्थ्यांना पावती दिली जात नाही. पावती का देत याबाबत विचारले असता इ पॉश मशीन बंद आहे. सर्वर डाऊन आहे, कागद संपला आहे अशी अनेक कारणे सांगून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाते तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार धान्य वाटप केले जात नाही अश्या तक्रारी आहेत.
अशी बनवाबनवी व हेराफेरी करुन गोरगरिबांच्या वाट्याला येणारे धान्य स्वस्त धान्य दुकानदार हे काळ्या बाजारात विकत असल्याचे बोलले जाते तसेच गावागावातून काही व्यापारी फिरुन हे रेशनिग दुकानातून मिळणारे तांदूळ दहा रुपये किलोने खरेदी करुन त्याची साठवणूक करुन पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावातील राईस मिल वर नेऊन विकतांना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या नावाजलेल्या राईस मिल मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ, मोठे ट्रक व कंटेनर भरुन मोठ्या प्रमाणात तांदूळ आणला जात आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता जळगाव, धुळे, मालेगाव, संभाजीनगर व आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी हा भाताचे पिक घेत नाही मग या खेडेगावातील राईस मिल मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तांदूळ येतो कुठून असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. विशेष म्हणजे या राईस मिल मध्ये तांदूळ आणतांना मध्यरात्री नंतर अंधाराचा फायदा घेत वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक करतांना राईस मिल असलेल्या गावाजवळील बाजारपेठेतील, भरवस्तीत असलेल्या मुख्य रस्त्यावरुन या अवजड वाहनांची वर्दळ होत असल्याने ग्रामस्थांना झोप घेणे दुरापास्त झाले असून या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करुन बनवलेला सिमेंट कॉंक्रिटीकरणचा रस्ता दिसेनासा झाला आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात या राईस मिलमध्ये हा तांदूळ येतो कुठून व नंतर या तादूळाचे पुढे काय होते याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून या ठिकाणी रेशनिंगच्या तादुळाला पॉलिश करुन विकला जात असल्याचे सांगितले जाते.
या सर्व गैरप्रकारांची दखल घेत शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानीपणाला लगाम घालण्यासाठी व धान्याचा काळाबाजार थांबवून संबंधित राईस मिल मध्ये सुरु असलेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी सुज्ञ नागरिक आता लवकरच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.