वरखेडी, भोकरी गाव परिसरात जुने मोबाईल लॅपटॉप व सी. पी. यू. खरेदीचा व्यवसाय तेजीत, चोरीच्या मोबाईलची खरेदीविक्री होत असल्याचा संशय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१०/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरखेडी, भोकरी गाव परिसरात भंगारची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येत असून हा भंगार व्यवसाय दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. भंगारचा व्यवसाय करतांना फुट, तुट झालेल्या लोखंडी किंवा इतर धातूंच्या वस्तूंची खरेदी केली जाते असे असले तरी फुट, तुट झालेल्या वस्तू खरेदी करतांना त्या कुठून आल्या, त्या वस्तू म्हणजे भंगार विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा तपशील नावगाव अशी कोणतीही शहानिशा न करता आलेल्या संधीचा फायदा घेत कमीतकमी दरात भंगार खरेदीचा व्यवसाय तेजीत आहे.
अश्या प्रकारे सुरु असलेल्या या भंगार व्यवसायामुळे गाव परिसरातील तसेच शेती शिवारातील शेतीपयोगी लोखंडी अवजारे, इलेक्ट्रिक (विद्युत) पंप म्हणजे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी हे विद्युत पंप सुरु करण्यासाठी लागणारे स्टार्टर व इतर अत्यावश्यक वस्तू चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी अजूनच हतबल झाला आहे.
*****************************************************************
मोबाईल, लॅपटॉप व सी. पी. यू. खरेदीचा ठोक व्यवसाय तेजीत.
*****************************************************************
तसेच वरखेडी व भोकरी परिसरात एका व्यवसायीकाने टपरी वजा दुकान सुरु केले असून या टपरी मध्ये जुने मोबाईल, लॅपटॉप व सी. पी. यू. घेण्याचा व्यवसाय सुरु केला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या ठिकाणी संपूर्ण जिल्हा व तालुक्यातीलच नव्हे तर मराठवाडा व जिल्ह्याच्या बाहेरुन काही लोक दुचाकीवरुन व चारचाकी वाहनातून या ठिकाणी बॅगाच्या, बॅगा भरुन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीस आणतात व येथे या वस्तू विकत घेतल्या जातात अशी माहिती समोर येत आहे.
तसेच या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले मोबाईल, लॅपटॉप व सी. पी. यू. या वस्तू विकत घेतांना या खरच कालबाह्य झाल्या आहेत का या वस्तू खरच भंगारात घेण्यासारख्या आहेत का, या वस्तूंचा खरा मालक कोण ज्याने या वस्तू भंगारात विक्रीसाठी आणल्या आहेत ती व्यक्ती कोण, कोणत्या गावाची, त्याचा मुळ व्यवसाय, आधार कार्ड याची कोणतीही शहानिशा न करता किंवा त्यांच्याकडून कीती मोबाईल, लॅपटॉप व सी. पी. यू. खरेदी केले याचा कोणताही तपशील न ठेवता हा व्यवसाय केला जात असल्यामुळे या ठिकाणी नक्कीच चोरीच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जात असाव्यात असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
व या व्यक्त करण्यात आलेल्या संशयाला दुजोरा मिळात आहे. कारण दररोज शेकडो मोबाईल दिवसाढवळ्या, राजरोसपणे चोरी होत आहेत. या वस्तू चोरीला गेल्यावर संबंधित व्यक्ती पोलीसात तक्रार दाखल करतात पोलीसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस इमानेइतबारे तपास करत असतात परंतु हे चोरीला गेलेले मोबाईल पुन्हा वापरात आले तरच ते पोलीस तपासात सापडू शकतात मात्र या चोरीला गेलेल्या मोबाईल, लॅपटॉप व सी. पी. यू. भंगार मध्ये विक्री जातात व त्यांची जागेवर तोडफोड करुन ते नष्ट करत त्यातील वापरात येणारे किंमतीचे पार्ट काढून घेत इतर भाग जाळुन टाकले जात असल्याचे दिसून येते.