कापूस पिकावर देशी दारुची फवारणी करा, बोगस खत विक्रेत्यांनी दिला शेतकऱ्यांना अफलातून सल्ला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द, भोजे, पिंपळगाव हरेश्वर, लोहारा या गावातील काही लालची कृषी केंद्राच्या व्यवस्थाकांनी कमी भांडवल व कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या नादात सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट हे खत विक्री करुन शेतकऱ्यांना फसवले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट ज्या, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कापूस पिकाला दिले आहे. त्या, त्या शेतकऱ्यांचे टवटवीत असलेले कापूस पीक कोमेजून सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन पाचोराचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक वृत्त कुऱ्हाड खुर्द गावपातळीवर ऐकायला मिळत आहे.
या सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट हे खत खरेदी करुन ज्या, ज्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापूस पिकाला दिले आहे. त्या, त्या शेतकऱ्यांच्या शेतातील बहरलेली हिरवीगार कापसाची झाडे कोमेजून गेली असून झाडांची पाने लाल पडून कापूस पिक सुकत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कापूस पिकाला सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट हे दिले होते त्यांनी पाचोराचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन संबंधित कृषी अधिकारी यांनी कुऱ्हाड व इतर ठिकाणी शेतशिवारात जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली आहे. ज्यावेळी हे कृषी अधिकारी शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा पिडीत शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरुन तुम्ही डोळे बंद करुन फुकटचा पगार घेतात का ? असा प्रश्न उपस्थित करत संबंधित खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
(मांजर मारली खत विक्रेत्यांनी व काशी करावी लागते आहे शेतकऱ्यांना.)
असे असले तरी आमचे काहीच होणार नाही. आमचे हात लांब आहेत अशी शेखी हे बोगस खत विक्रेते करुन मिरवून घेत आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तसेच तुम्हाला जर तुमचे कापूस पिकाचे नुकसान होऊ द्यायचे नसल्यास लवकरात, लवकर (देशी दारुची) फवारणी करावी लागेल असा सल्ला देत आहेत.
हा अजब, गजब सल्ला ऐकल्यावर सहज म्हणावेसे वाटते की
मांजर मारल्यावर वारी करावी लागते म्हणे काशीची, बोगस खत विक्रेते सांगतात आता कापसावर फवारणी करुन घ्या देशीची.
(कृषी विभागाची भुमिका गांधींच्या तीन माकडांसारखी.)
——————————————————–
पिंपळगाव हरेश्वर, भोजे, कुऱ्हाड, लोहारा व जामनेर तालुक्यातील मोराड येथील काही कृषी केंद्रातून या बोगस खतांची खुलेआम विक्री करण्यात आली आहे. तरीही कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गैरप्रकाराकडे लक्ष का दिले नाही ? तसेच आता हा प्रकार उघडकीस आला आहे तरीही त्यांची भुमिका पाहू, करु अशी दिसून येत असल्याने याबाबत शेतकऱ्यांमधून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत.