आमदार साहेब शिवस्मारकासोबत शिवराज्य पध्दतीचा अवलंब करावा, तरच खऱ्या अर्थाने शिवस्मारक उभारल्याच सार्थक होईल. संतोष पाटील.
दिनांक~०९/०२/२०२४
आमदार साहेब शिवस्मारकासोबत शिवराज्य पध्दतीचा अवलंब करावा, तरच खऱ्या अर्थाने शिवस्मारक उभारल्याच सार्थक होईल.
संतोष पाटील.
———————————————————-
तालुक्याचे (पाचोरा) आमदार साहेब गावागावात शिवस्मारक बांधत आहेत या गोष्टीचा प्रत्येक शिवभक्तांना महाराजांच्या मावळ्यांना आनंद झाला, खरं म्हणजे महाराजांच्या स्मारकांची गरज आहे, पण त्यासोबत महाराजांचे विचार आचार समाजामध्ये रुजवण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देवालाही हात लागू न देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांच खळचं उध्वस्त केलं जातय, एकाही शेतीमालाला योग्य भाव नाही, शेतकऱ्याची प्रचंड पिळवणूक होत आहे.
तसेच तालुक्यात, महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अन्याय अत्याचार, दोन नंबरचे धंदे अशा अनेक समस्यांवर काम करण्याची गरज आहे. आपण एखाद्या महापुरुषाचे स्मारक उभे करतो जेणेकरून त्या परिसरातील लोकांनी तरुणांनी महापुरुषांच्या विचारांच्या पावलावर चालून राष्ट्र निर्मितीच्या कार्यास स्वतःला वाहून घेतलं पाहिजे, माणूस म्हणून जगलं पाहिजे ही त्यामागची धारणा असते. आज रोजी महाराष्ट्रामध्ये सकल महापुरुषांचा अपमान होतो आहे महापुरुषांबद्दल चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. नको त्या गोष्टी बोलल्या जात आहे त्यावेळेस आपलं सरकार आपल्या सरकारातील आमदार, खासदार काहीच बोलत नाहीत.
मग निव्वळ मतदानाचा, राजकारणाचा विचार करून महापुरुषांचा वापर करणे कितीसे योग्य आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भेटलेला नाही, अवकाळीची मदत भेटली नाही. केळी सारख पीक पिक विम्यातून वगळल गेलं असे असंख्य प्रश्न अडचणी आहेत यावर आपण विचार करावा आपणास तालुक्याच्या समाजाचा विकास करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले आहे याचं आत्मभान ठेवावं, धार्मिक उत्सव, (त्यांचे विचार आचरणात न आणता) महापुरुषांच्या जयंती, क्रिकेटचे सामने, बैलगाडा शर्यती, लोकांची लग्न, सुख दुःख इतकेच आमदाराचे काम नाही तर आमदार हा तालुक्याचा पालक असतो हे आपणास सांगणे न लागे.
या भरकटलेल्या गरीब दुबळ्याच्या पोरांना उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने कुठे तरी स्थिर करता येईल का ? या गरिबाच्या पोरांची लग्न होत नाहीत कारण यांच्या हाताला काम नाही. काम नाही म्हणून यांना कोणी मुलगी देत नाही. ही दिशाहीन झालेली मुलं व्यसनाधीन होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. त्यांना या काळाच्या जोखडातून सोडवण्यासाठी व योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार व आचार रुजवण्यासाठी शिवस्मारकासोबत ठोस कृतीची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय निती विश्वास या जोरावर स्वतःच राज्य निर्माण केलं आणि ते राज्य आज रोजी आपल्या हातात दिलं, मात्र त्या स्वराज्याची वाताहात होताना पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी येत असेल यात शंकाच नाही. गावागावात शिवशाहीचे वारे वाहिले पाहिजे माझ्या राजांचे स्मारक झाले पाहिजे आणि शिवकालीन राज्यपद्धती
*शिवधर्म, शिवतंत्र शिवतत्व,* *शिवसत्व*,
*शिवनीती, शिवशास्त्र,* *शिवशिक्षण, शिवशक्ती* अमलात आली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं शिवस्मारक उभारण्याचं सार्थक होईल असो पुढील निर्णय व कार्य आपणास योग्य वाटेल तसे करावे….
संतोष पाटील
7666447112