वावडदा येथील रणरागिनी भडकल्या, दारूबंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन धडकल्या.
सुमीत पाटील.(वावडदा)
दिनांक~१९/११/२०२१
जळगाव येथून जवळच असलेले वावडदा हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावात मागील काही दिवसापासून गावठी व देशी दारूची अनाधिकृत विक्री केली जात आहे. या कारणास्तव वावडदे गावात अशांतता पसरली आहे. तसेच गावातील अल्पवयीन व तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढीच्या दृष्टिकोनातून ही खेदजनक बाब आहे. तसेच बरेचसे लोक आपल्या व्यसन पूर्तीसाठी घरातील दाग, दागिने, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य विकून व्यसन पूर्ती करतांना दिसून येतात. तसेच गावात व घरात धिंगाणा घालून महिलांचा छळ करत असतात.
बाटलीने बाटला तो, संसारातून उठला
या प्रकारामुळे बरेचसे संसार बरबाद झाले असून बरेचसे संसार बरबादीच्या मार्गावर आहेत. गावातील अवैध दारु विक्री बंद व्हावी म्हणून महिलांनी वारंवार आवाज उठवून व अधूनमधून पोलिस कारवाई झाल्यावरही हे अवैधधंदे करणारे आपले अवैधधंदे बंद करत नसल्याचे दिसून येते. परंतु दारु विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही असा आरोप वावडदे गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
मागणी करुनही अवैधधंदे बंद होत नसल्याने गावातील सुज्ञ नागरिक व महिला संतप्त झाल्या होत्या. यातच भरीस भर म्हणून एका दारुड्याने काही दिवसापूर्वी दारूच्या नशेत आपल्या ताब्यातील स्वयंचलित दुचाकी भरधाव वेगाने चालवत एका महिलेला धडक दिल्यामुळे त्या अपघातात एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या कारणास्तव गावातील महिलांचा संताप अनावर झाल्याने दिनांक १९ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी महिलांचि एक ताफा सरळ ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन हल्लाबोल करत दारूबंदीचा ठराव करण्यासाठी आग्रह धरला व कायमची दारूबंदी करण्यासाठी मागणी केलेली आहे.
आता महिलांनी रणरागिनी सारखे उग्ररूप धारण केले असून गावातील जवळपास २५० महिलांनी दारुबंदी करण्यासाठी एक निवेदन तयार करत सह्यांची मोहीम राबविली आहे. तसेच या महिला थोड्याच दिवसात जिल्हा पोलिस अधीक्षक, आमदार, खासदार व मंत्रालयापर्यंत धडकणार असल्याने आता नक्कीच वावडदे गावातील दारू बंद होईल व गावात शांतता नांदेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.