शेंदूर्णी येथील सार्वजनिक जागेवर पडलेल्या लाकुड साठ्यावर जळगाव वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली जप्तीची कारवाई.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०५/२०२३
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गरुड विद्यालयाच्या पाठीमागे, बिलवाडी रस्त्यावर तसेच चिलगाव रस्त्यावर व इतर सार्वजनिक जागेवर उघड्यावर पडलेला भल्यामोठा म्हणजे शेकडो ट्रॅक्टर लाकुड साठा जळगाव वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करत जप्त करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या कारवाईबाबत शेंदुर्णी, जामनेर, पहुर, कळमसरा, जंगिपुरा, मालखेडा, चिलगाव, बिलवाडी व इतर गावांतील निसर्गप्रेमींनी जळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. कारण जामनेर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून विरप्पनच्या पिल्लावळीने राजाश्रय मिळवत धुमाकूळ घालत राखीव जंगल, गावठाण जमीन तसेच गायरान जमीनीवरील व शेत शिवारातील हिरव्यागार महाकाय वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करुन हे लाकुड सार्वजनिक जागेवर साठवून ठेवले होते.
हा प्रकार पाहून काही निसर्गप्रेमींनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे वारंवार तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने सरतेशेवटी जळगाव वनविभागाचे कार्यालयात तसेच जळगाव जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी साहेब, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
कारण जळगाव जिल्हाने उष्णतेचा उचांग ओलांडून भारतात आठवा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवून नावलौकिक कमावला आहे. व ही वृक्षतोड अशीच सुरु राहिल्यास भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल म्हणून या तक्रारी करण्यात आल्या होत्या असे काही निसर्गप्रेमींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सत्यजित न्यूज कडे मत व्यक्त केले आहे.
(जळगाव येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेंदुर्णी येथे येऊन उघड्यावर पडलेल्या लाकुड साठ्याची पाहणी करत छायाचित्रे व चित्रफिती काढून पाचोरा व जामनेर येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक, एक लाकडाचा रितसर पंचनामा करुन जप्तीचे आदेश दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होईपर्यंत जामनेर व पाचोऱ्याचे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी झोपा काढत होते कि अर्थपूर्ण झोपेचे सोंग घेऊन झोपले होते असा आरोप जनमानसातून केला जात असून आतातरी वरिष्ठांच्या आदेशानुसार इमानेइतबारे पंचनामे करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.)