अमडदे येथील पुराणी गल्लीतील गटारीचा प्रलंबित प्रश्न तब्बल पंचवीस वर्षांनी सोडवला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२३
अमडदे गावाची सरपंच पदाची धुरा मागील तीन महिन्यांपासून सौ. वैशालीताई पिरन पाटील यांनी हातात घेतल्यापासून अमडदे गावातील मागील काळातील प्रलंबित प्रश्न सोडवत गावात इतर नवीन विकासकामे करण्यासाठी विडा उचलला आहे. सौ. वैशालीताई पाटील यांनी सगळ्यात अगोदर अमडदे गावातील व्यायाम शाळेत तसेच आसपासच्या परिसरातील अतिक्रमण काढून गावातील तरुणांना व्यायामाची चांगली व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे.
तसेच अमडदे गावातील पुराणी गल्लीतील सांडपाण्याच्या गटारीचा प्रश्न मागील पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता. यामुळे या पुराणी गल्लीत सांडपाणी वाहून जात नसल्याने या गल्लीत घाणीचे साम्राज्य पसरले होते. तसेच हेच सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या खड्ड्यात जाऊन ग्रामस्थांना दुषित पाणी मिळत होते, डासांचा उपद्रव वाढला होता. ही बाब लक्षात घेऊन अमडदे येथील ग्रामस्थ माजी उपसभापती मा. श्री. संभाजी भोसले यांनी सांडपाण्याची गटार व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे याकरिता सतत पाठपुरावा करत मागणी लावून धरली होती. तसेच पंकज पाटील, छोटू पाटील व अमोल भद्रा यांनी वारंवार केलेल्या अर्जाची दखल घेत सौ. वैशालीताई पाटील यांनी सगळ्यात अगोदर मागील पंचवीस वर्षांपासूनचा पुराणी गल्लीतील सांडपाण्याच्या गटारीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करुन देत लगेचच बांधकाम सुरु केले आहे.
पुराणी गल्लीतील सांडपाण्याच्या गटारीचे कामाला सुरुवात झाली असून यामुळे आता पुराणी गल्लीतील रहिवाशांची दुर्गंधी व डासांपासून सुटका होणार असून पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असल्याने पुराणी गल्लीतील रहिवाशांनी व अमडदे गावातील नागरिकांनी सरपंच सौ. वैशालीताई पाटील यांचे आभार मानले आहेत. व भविष्यातही अशाच नवनवीन याजना आणून गावाचा विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.