शेंदुर्णी ते सुरत चालणाऱ्या ट्रॅव्हल चालकांची हिरो गिरी, रस्त्याने लहान, मोठ्या वाहनांना कट मारण्याचा प्रकार मोठ्या अपघाताची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२४
आज रोजी सायंकाळी शेंदुर्णी येथुन सुरतकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाने मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान हिरोगीरी करत दोन दुचाकी स्वरांना तसेच लहान चारचाकी व बैलगाडीला कट मारुन तर कधी गाडी अंगावर आणतोय अश्या पध्दतीने गाडी चालवत मी खुपच भारी ड्रायव्हर असून मी कसे वाहन चालवू शकतो असा देखावा निर्माण केला. या ड्रायव्हरच्या हिरोगीरीने आज रोजी अंबे वडगाव गावाजवळील पी. सी. के. कॉटन जिनिंग जवळ दोन दुचाकी स्वरांच्या अंगावर गाडी घालून कट मारल्याची घटना घडली आहे. या ट्रॅव्हल कंपन्यांच्या चालकाने कट मारल्यामुळे हे दोघेही दुचाकीस्वार थोडक्यात बचावले व त्यांनी लगेचच ट्रॅव्हलचा पिच्छा करुन अंबे वडगाव बसस्थानकाजवळ चालकाला जाब विचारला असता त्याने अरेरावीची भाषा वापरुन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गावकऱ्यांनी सत्य परिस्थिती जाणून घेत ट्रॅव्हल चालकांला चापटांचा प्रसाद देऊन समजून सांगितले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु ट्रॅव्हल चालकांचा असाच मनमानी कारभार सुरू राहिल्यास एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
सद्यस्थितीत सगळीकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यामागील कारण म्हणजे या खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती व या जाहिरातीच्या माध्यमातून वातानुकूलित तसेच आरामदायक प्रवासाची व्यवस्था असल्याचे सांगितले जात असल्याने या जाहिरातींवर विश्वास ठेऊन बरेचसे लोक या खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाडीतून बिनधास्तपणे प्रवास करतांना दिसून येतात.
वास्तवात मात्र या फक्त जाहिरातीतून नामांकित म्हणवून घेणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्यांकडून प्रवाशांना वेगळाच अनुभव येत असून ट्रॅव्हल कंपन्यांकडून आपली फसवणूक होत असल्याने वैतागलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण या ट्रॅव्हल कंपन्यांकडून वापरण्यात येणाऱ्या ट्रॅव्हल गाड्यांची परिस्थिती पाहता बऱ्याचशा गाड्या या सुस्थितीत नसल्याचे दिसून येते. तसेच या गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटी, प्रवाशाला मळमळ, उलटी होत असल्यास त्यांना देण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी, कदाचित एखाद्यावेळी काही दुर्घटना घडली तर फायर फायटर दिसून येत नाही. तसेच या खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाड्या ह्या जुनाट असल्याचे दिसून येते.
तसेच या खाजगी कंपनीच्या ट्रॅव्हल चालकांची नेमणूक करतांना तो प्रशिक्षित आहे किंवा नाही याची शहानिशा न करता फक्त आणि फक्त कमी पगारात काम करणाऱ्या चालकांना गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवून घेतले जाते. तसेच हे चालक गाडी चालवतांना वेळोवेळी बऱ्याचसा वेळ भ्रमणध्वनीवर बोलतांना दिसून येतात व आपल्या सोबत असलेला मदतनीस म्हणजे वाहकाला जवळ बसवून गप्पा मारतांना दिसून येतात. तसेच गाडीमध्ये प्रेमापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करतांना थेट चालकाच्या कॅबिनमध्ये सुध्दा प्रवासी बसवून वाहतूक करतांना आढळून येतात.
विशेष म्हणजे शेंदुर्णी ते सुरत हा लांब टप्प्याचा प्रवास असल्याने प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी व अल्पोपहार, जेवण करण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी गाडी थांबणे क्रमप्राप्त असतांनाही हे ट्रॅव्हल गाड्यांचे चालक व वाहक हे कुणाचेही ऐकून न घेता त्यांना पटेल अशा हॉटेल, ढाबा व उपहारगृहाजवळ गाड्या थांबवत असल्याने या संधीचा फायदा घेत हे हॉटेल, ढाबा व उपहारगृहाचे मालक याच संधीचा फायदा घेत मनमानी दर आकारणी करुन गरजू प्रवाशांची लुट करतात याचेच जीवंत उदाहरण म्हणजे शुद्ध पाण्याच्या बाटली साठी चक्क विस रुपये मोजावे लागतात तर मग इतर खाद्यपदार्थांची किंमत काय असेल याबाबत विचार न केलेलाच बरा असे मत जाणकार प्रवाशांनी व्यक्त करत “गरज वंताला अक्कल थोडी” या पध्दतीने वेळ काढून न्यावी लागते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या चालक व वाहकाच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी संबंधित ट्रॅव्हल कंपन्यांच्या मालकाकडून समज देण्यात यावी तसेच चांगल्या प्रशिक्षित चालकांची नेमणूक करावी अशी मागणी केली जात आहे.