प्रवाहाच्या विरोधात जाऊन मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरावा, शैलेश जोशी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०५/२०२३
भारत सध्या संक्रमण काळातून जात असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे देशात अमुलाग्र परिवर्तन घडून येणार आहे. अनेक वर्ष इंग्रजांनी निरनिराळ्या प्रकारचे विचार स्थापित करण्याचा प्रयत्न केला. संस्कृत ही मृत भाषा आहे, भारत देश मागासलेला आहे, इंग्रजीचे शिक्षण घेतलेला व्यक्ती हाच गणमान्य असतो असाच विचार त्यांनी भारतीयांच्या मनावर अंकित केला. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आणि आपण घेतलेल्या प्रशिक्षणामुळे पुढची पिढी भारताबद्दलचा गौरव भाव मनात बाळगणारी निर्माण होईल याची खात्री आहे. तसेच पालक इंग्रजीत शिकवण्याचा आग्रह धरीत असले तरी त्यांना समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. प्रवाहाच्या विरोधात जाऊन मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे असे प्रतिपादन विद्या भारती देवगिरी प्रांत व विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री शैलेश जोशी यांनी केले. विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान द्वारा आयोजित पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
प्रशिक्षणात बालकांचा पंचकोशात्मक विकास व व्यष्टि ते परमेष्टी विकासाबरोबरच पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान इत्यादी विषयांचा अंतर्भाव करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानंतर सरस्वती वंदनेने करण्यात आली. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन प्रांत मंत्री प्रकाश पोतदार यांनी केले. संपूर्ण प्रशिक्षण वर्गाचा अहवाल वर्ग संयोजिका श्रीमती वनमालाताई कुलकर्णी यांनी सादर केला. वर्गातील प्रशिक्षणार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विवेक काटदरे यांनी पूर्ण समर्पण भावना माणसाला आनंद देते. त्यामुळे शिक्षकांनीपूर्ण समर्पण भावनेने कार्य करावे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी व्यासपीठावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, संचालक उमेश जगताप, खान्देश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, प्रांत मंत्री प्रकाश पोतदार , जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप भावसार व श्रीमती वनमाला ताई कुलकर्णी होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांत शिशु वाटिका सहप्रमुख सौ. सुरेखा सोनार यांनी केले. कार्यक्रमात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक ऍड्. रोहित सर्वज्ञ व जळगाव येथील सुप्रसिद्ध (सी. ए.) रोहित कोलते, विभाग मंत्री निलेश पाटील, जिल्हा मंत्री प्रदीप गुजर, दिनेश नाईक व गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.
प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्था भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबेजोगाईचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी संस्था विद्या भारतीशी संलग्न होत असल्याची घोषणा केली व तसा संस्थेचा ठराव विद्या भारतीचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.विवेक काटदरे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात रावेर येथील किलबिल अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ. नयना निलेश पाटील यांच्या शिशु गीतांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.