नवरदेव घोड्यावर तर वऱ्हाड वाऱ्यावर, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०५/२०२३
कडकडीत उन्हाळ्यात विवाह सोहळ्यांनी वेग धरला असून मोठमोठ्या शहरांसह गाव, खेड्यापाड्यातील वाडा, वस्तीवर लग्नाची धामधूम बघायला मिळते आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वऱ्हाड्यांची ने, आण करण्यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे वाहन व्यवस्था करुन वऱ्हाडी मंडळींना विवाह सोहळ्यात नेऊन परत घरी आणले जात आहे.
परंतु असे करतांना सगळ्यांनाच एस. टी. बसेस भाड्याने घेणे परवडणारे नाही. तसेच प्रत्येकाला एस. टी. बस मिळेलच याची शाश्वती नाही. म्हणून काही लोक खाजगी बसेस म्हणजे (ट्रॅव्हल) करुन तर काही लोक क्रुझर, इको, इंडिका व इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून वऱ्याडी मंडळींची वाहतूक करत आहेत. मात्र या प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी असलीतरी या वाहनातून प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे वाहन क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे राज्य परिवहन महामंडळाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून गुराढोरासारखी वऱ्हाड्यांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते.
ही अवैध वाहतूक येथेच थांबत नाही तर अत्यंत कमी भाड्यामध्ये मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो, मालवाहतूक करणारी रिक्षा, ट्रक, मिनी डोअर अश्या वाहनातून वऱ्हाड्यांची गुराढोरासारखी वाहतूक केली जात असून या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टपावर, कॅबिनवर, वाहनाच्या मागील बाजूस लटकवून तसेच चालकाच्या कॅबिनमध्ये दहा ते पंधरा प्रवासी बसवून लहान, लहान मुलांबरोबर ही जीवघेणी वाहतूक सुरु आहे.
विशेष म्हणजे जळगाव जिल्हाने उष्णतेचा उचांग मोडीत काढत जगातील आठवा व देशातील पहिला क्रमांक पटकावला असल्याने ही उघड्यावर होणारी प्रवासी वाहतूक जीवघेणी ठरत आहे. तसेच काही वऱ्हाडी मंडळी वाहनांच्या कॅबिनवर तसेच मागील टपावर बसून प्रवास करत आहेत. यामुळे रस्त्यावरुन गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श होऊन किंवा एखाद्या झाडाची फांदी डोक्याला लागुन अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते तसेच ट्रक व टेम्पोच्या मागील भागाच्या लाकडी फळीवर बसून व उभे राहून बरीचसी वऱ्हाडी मंडळी प्रवास करतांना हात सुटल्यावर किंवा गाडी उधळल्यावर एखादा प्रवासी खाली पडून जिवानिशी जाऊ शकतो व आजपर्यंत उष्माघाताने किंवा या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून वऱ्हाड्यांची ने, आण करतांना अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. दररोजच्या घटना घडत आहेत. म्हणून हा चाललेला नंगानाच थांबवण्यासाठी कायद्याच्या रक्षकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाईचा बडगा उगारला पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
सुचना~ दिवसेंदिवस जळगाव जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून उघड्या वाहनातून प्रवास करतांना उन्हाचा त्रास होऊन उष्माघाताने एखाद्याचा जीव जाऊ शकतो म्हणून लग्नसमारंभ ज्यांच्या घरी आहे त्यांनी व वऱ्हाडी मंडळींनी एकमेकांना समजून घेत चांगल्या वाहनातून मोजकीच माणसे नेऊन कायद्याची वाट न पाहता आपणच आपली जबाबदारी समजून विवाह पार पाडावे असे आम्हाला वाटते.