खाजगी शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी टाळाटाळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील काही खाजगी शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने विद्यार्थी व पालक वर्ग चिंतेत झाले आहेत. यामागील कारण म्हणजे विद्यार्थी व पालकांना त्यांना हव्या असलेल्या शिक्षण संस्थेत दुसरीकडे प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अत्यंत गरजेचा आहे. परंतु या खाजगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेची पटसंख्या कमी होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
काही विद्यार्थी व पालकांना आपल्या सोयीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणे हे आजच्या धकधकीच्या जीवनात महत्त्वाचे आहे आपली मुले व मुली शाळेत गेल्यानंतर त्यांना सुरक्षितता राहावी म्हणून बऱ्याचशा पालकवर्गांनी आपल्या सोयीच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. परंतु काही शिक्षण संस्थांच्या अडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळेवर मिळत नसल्याने त्यांना दुसरीकडे प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत संपत आल्याने विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग चिंतेत झाला आहे.
वेळेवर शाळा सोडल्याचा दाखला न मिळाल्यास काही विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने काही पालक वर्ग माननीय जिल्हाधिकारी जळगाव व शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तरी अशा मनमानी करणाऱ्या शाळांना संबंधित विभागाने सूचना देऊन ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केली असेल त्यांना त्वरित दाखले देण्यात यावे अशा सूचना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.