कमी’ तापमानात अनवाणी फिरणाऱ्या जैन ‘मुनिश्री’ म.साहेब एक तपसाधनेचे प्रतीक.
प्रा.दिलीप पाटील.(कुसुंबा)
दिनांक~२७/०१/२०२३
कमी तापमान असो किंवा कडक उन्हामुळे जीवाची लाही लाही होत असली तरी यामुळे जैन मुनीश्री म .साहेब -साध्वींच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही. एरव्ही उन्हाळा असो पावसाळा असो वा हिवाळा असो कोणताही ऋतू असो मोक्षपथगामी मार्गाकडे जात असताना २८ मुल गुणांचे निर्दोष पालन करण्यासाठी विविध ऋतूंचा परिषह सहन करून त्यावर जय मिळवितात सन्मार्गाचे वस्त्र देणारा निर्वस्त्र निष्काम तपसाधनेचा प्रतीक म्हणावे लागेल. असे उक्त विचार पद्मावती युवा मंच तसेच पार्श्वनाथ सेवा समितीचे चर्चासत्र प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर येथील आ.मा.पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मा. श्री. दिलीप झुलाल पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले.
अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश वसंतीलाल जैन (कुसुंबा) यांनी दिली. पाटील सरांनी पुढे बोलतांंना सांगितले की थंडीच्या दिवसात प्रातःकाली तर, उन्हाळ्यात भरदुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कोणी करत नाही. मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन मुनी याला अपवाद आहेत. हुडहुड कितीही असो सूर्य कितीही आग ओकत असो ,तरी ते रोज अनवाणी पायाने बाहेर पडतात व त्यांच्या सहनशीलतेला आणि त्यागमय संयम जीवनाला सर्वच जण त्रिवार नमन करतात.
म्हणून धन्य धन्य ते जीवन व धन्य ती तपसाधना असे उद्गार नकळतपणे आपोआपच निघतात. २४ तासात आहार प्रसंगी एकाच वेळी आहार व पाणी ग्रहण करीत असतात. आपण ए.सी. खोलीमध्ये बसून वाढलेल्या तापमाना बाबत रडगाणे गात असतो, पण जैन तपस्वींची दिनचर्या प्रतिदिन सारखीच असते. पूज्य तपस्वी त्यागी वृन्द रणरणत्या उन्हामध्ये असो वा थंडी असो आहार विधी साठी (गोचरी भिक्षा चर्याकरण्यासाठी) अनवाणी बाहेर पडतात.
दिगंबर अवस्थेत हुडहुडपणा, या उन्हाळ्यात उन्हाचे चटके तापलेल्या रस्त्यांवरचे पायाला चटके या तपस्वीगणांना पाहून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते एवढ्या कमी तापमानात व कडक उन्हात व तापलेल्या रस्त्यांवर ते कसे चालत असतील असा प्रश्न सर्वांच्याच मानात निर्माण होतो व त्यांचा त्याग पाहून भक्तगण श्रद्धेने झुकतात. जैन त्यागी तपस्वी कडक थंडीच्या व उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरही चालू शकतात ,कारण त्यांच्याकडे त्याग व कठीण साधनेचे बल आहे. पंचेंद्रियावर त्यांनी विजय प्राप्त केला आहे. कर्माची निर्जरा कठीण साधनेत होते. त्याबाबत सामान्य व्यक्ति विचारही करू शकत नाही. या साधनेच्या बळावर ते भगवान महावीर यांच्या संदेशाचा संपूर्ण जगात प्रसार करीत आहेत.
अनेक भाविक भगवान महावीर यांचा मार्ग आत्मसात करण्यासाठी जैन तपस्वींन सोबत चालायला लागतात. असेच सध्यास्थितीत हुडहुडीच्या तापमानात कुसुंब्याहुन प.पु. सूदेहसागरजी महाराज यांचे आपल्या जन्मभूमी कोल्हापूर कडे प्रस्थान झाले आहे.