कोकडी शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात एक जखमी, सुदैवाने अनर्थ टळला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात कुऱ्हाड येथील शेतकरी प्रविण सुभाष पाटील वय वर्षे ३५ हे सकाळी त्यांच्या वडिलांच्या गट नंबर १५ या शेतात भुईमूग पिकाची काढणी करण्यासाठी गेले असता भुईमूग काढणीचे काम करत असतांनाच आज सकाळी अंदाजे साडे अकरा वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या मालखेडा जंगलातून एक रानडुक्कर धावत येऊन त्याने शेतात काम करत असलेल्या प्रविण पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रविण पाटील जमीनीवर कोसळले व मदतीसाठी आराडाओरड केली तेव्हा शेतातील इतर मजूर व आसपासच्या शेतकऱ्यांनी प्रविण पाटील यांच्याकडे धाव घेऊन रानडुकराला हाकलून लावत प्रविण पाटील यांना रानडुकराच्या हल्ल्यातून वाचवले व वैद्यकीय उपचारासाठी पाचोरा घेऊन गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे कोकडी तांडा, कुऱ्हाड, लोहारा, म्हसास, मालखेडा या गावालगतच्या शिवाराला पाचोरा व जामनेर तालुक्यातील मोठे क्षेत्र असलेले वनविभागाचे राखीव जंगल आहे. या जंगलात मागील आठवड्यात बिबट्याने एका गायीचा फडशा पाडला होता यामुळे या शिवारात बिबट्याची दहशत निर्माण झाली असतांनाच आज रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्यामुळे या शिवारात जंगली प्राण्यांच्या भितीमुळे शेतमजूर शेतात काम करण्यासाठी येत नसल्याने शेतकरी वर्गासमोर संकट उभे राहिले आहे.
विशेष म्हणजे या राखीव जंगलात रानडुक्कर व इतर जंगली प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून उन्हाळ्यात या जंगली प्राण्यांसाठी पाणवठे तयार केले नसल्याने हे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात शेत शिवारात तसेच मानव वस्तीकडे येत असल्याने या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्यावेळी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वनविभागाने या जंगली प्राण्यांसाठी जंगलात पाणवठे तयार करावेत तसेच राखीव जंगलाच्या चारही बाजूंनी सिमा रेषेवर खोल चारी खोदावी किंवा संपूर्ण राखीव जंगलाच्या चारही बाजूंनी तारेचे कुंपण घालून जंगली प्राण्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.