येत्या पंधरा ऑगस्टला प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांकडून फक्त पाच रुपये स्व. कल्याणी दीदीच्या कुंटुबासाठी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२३
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या घटना संदर्भात जळगाव जिल्ह्यातून नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा निषेध होत आहे. या घटनेच्या निमित्त विविध संघटना सामाजिक संघटना तसेच राजकीय पुढारी, सर्वपक्षीय नेते पत्रकार व्यापारी असोशियन मार्केट व्यापारी असोसिएशन, डॉक्टर मंडळी, मेडिकल असोशियन, पेट्रोल पंप, असोशियन वकील मंडळी, अहिर स्वर्णकार समाज, शाळा, कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी व सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन जाहीर निषेध नोंदवला हा निषेध नोंदवतांना यावर्षी पावसाने भिजली नसेल एवढी जमीन या स्व. कल्याणी दीदींच्या शोकसभेत व निषेध मार्चात भिजली असेल असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण सगळ्यांच्या डोळ्यातून त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून असलेल्या संतप्त भावना व अश्रूंचा पूर वाहत होता.
ही घटना घडल्यानंतर भडगाव, पाचोरा तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी ही घटना विधानसभेत कथन करुन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. लगेचच मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना सुचना देत फास्ट ट्रॅक वर खटला चालवण्यासाठी आवश्यक त्या सुचना देत आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली जाईल अशी ग्वाही दिली आहे.
या घटनेत ज्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कसब पणाला लावून काही काळातच आरोपीचा शोध लाऊन त्याला ताब्यात घेतले आहे. या कामगिरीमुळे पोलीस यंत्रणेला धन्यवाद दिले तेवढे कमीच आहेत. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस खात्याची मान उंचावली आहे.
*महत्वाचे*
“स्व. कल्याणच्या कुंटुबासाठी”
पाचोरा, भडगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. स्व. कल्याणीला न्याय मिळेलच परंतु आज स्व. कल्याणच्या घरच्यांची परिस्थिती पाहता घरावर फक्त आणि फक्त पाच हजारांच्या किंमतीच्या पत्र्याच्या घरात ते रहात आहेत. वडील दिव्यांग आहे. आई मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे. तर एक भाऊ शाळेत शिकत आहे. हाताला काम मिळाले तर घरातील चुल पेटते अशी परिस्थिती आहे.
त्यातल्या त्यात या अशा अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबावर असा प्रसंग ओढवल्यावर त्यांची मनस्थिती व आर्थिक परिस्थिती सावण्यासाठी आपणही समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन येत्या १५ ऑगस्टला पाचोरा भडगाव तालुक्यातील प्रत्येक शाळेतून ध्वजारोहण साठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या सोबत स्वर्गीय कल्याणी दीदींच्या कुंटुबासाठी साठी फक्त पाच रुपये आणून आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावे अशी मी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती करीत आहे.
(शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही आर्थिक मदत जमा झाल्यावर पाचोरा तालुक्याचे मा. तहसीलदार साहेब यांच्याकडे जमा करावी.)