३२ तास उलटले तरीही वडगाव आंबे परिसरातील विद्युत पुरवठा खंडितच, विद्युत वितरण चे कर्मचारी म्हणजे आम्हाला पहा व फुले वाहा. ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा झिरो वायरमनच्या भरोशावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२३
काल दिनांक ०४ जून २०२३ रविवार रोजी दुपारी अंदाजे एक विजेच्या सुमारास जामनेर, पाचोरा, सोयगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. वादळ इतके जोरात होते की या वादळात केळी, मोसंबी, लिंबू, आंबा ही फळ पिके जमीन दोस्त होते अतोनात नुकसान झाले. तसेच याच वादळात मोठ मोठे महाकाय वृक्ष कोसळले सोबतच विद्युत तारा तुटून पडल्या तर काही ठिकाणी विद्युत खांब कोसळले असल्याने काल दुपारी एक वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. परंतु अद्यापही त्यांना यश न मिळाल्याने पाचोरा तालुक्यातील जवळपास पंधरा खेड्यांचा विद्युत पुरवठा बंद आहे. यामुळे गावागावाती पिठाच्या गिरण्या बंद झाल्या असल्याने वेळेवर धान्य आणून उपजीविका भागविणाऱ्या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तस पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावागावातील लोकांना आसपासच्या विहिरींचे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने एखाद्यावेळेस आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने वयोवृद्ध महिला पुरुष लहान बालके तसेच आजारी रुग्णांना वातावरणातील तापमानामुळे उकाडा होत असून कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे गावागावातून रहिवासी वैतागले असून विद्युत वितरण कंपनीने त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी एकमुखाने जोर धरत आहे.
(गावागावातील विद्युत पुरवठा झिरो वायरमंच्या भरोशावर.)
————————————————————
पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात नियुक्त केलेले विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी हे मुख्यालयात राहत नसून त्यांनी गावागावातील काही सुशिक्षित बेरोजगारांना हाताशी धरून त्यांना महिन्याकाठी पाच ते सात हजार रुपये देऊन परस्पर झिरो वायरमन म्हणून नियुक्ती केली आहे. ही झिरो वायरमन म्हणून नियुक्त केलेली मुले ग्रामीण भागातील संपूर्ण गावातील तसेच शेत शिवारातील विद्युत वितरण कंपनीचा कारभार पहात असल्याने गावागावात विद्युत वितरण कंपनीकडून नियुक्त केलेले कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी ट्रांसफार्मर आहे, कोणत्या ठिकाणी कट आउट बॉक्स आहेत, कोणत्या गावासाठी व कोणत्या शेत शिवारासाठी कोणत्या ट्रान्सफॉर्मरवरून विद्युत पुरवठा केला जातो याची सविस्तर माहिती नसल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा नैसर्गिक आपत्तीत विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर नेमका बिघाड कुठे झाला असेल हे त्यांच्या लक्षात येत नसल्याने बत्तीस, बत्तीस तास विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याचे जनमानसातून ऐकावयास मिळत असून या बाबीकडे विद्युत वितरण कंपणीचे अधिकारी लक्ष देत नसल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
गावागावातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रत्येक गावात नियुक्त केलेल्या विद्युत वितरण कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहणे सक्तीचे करण्यात यावे तसेच संबंधित नियुक्त कर्मचाऱ्याने त्या त्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये आपले हजेरी रजिस्टर ठेवून त्यावर दररोज नोंद करावी व विद्युत ग्राहकांसाठी तक्रार वही ठेवून या तक्रार वहीत विद्युत ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी पाहून त्यांच्या अडीअडचणी त्वरित सोडवण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे.