खाजगी फायनान्स कंपन्यांकडून गरजू ग्राहकांची आर्थिक लुट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०९/२०२३
सद्यस्थितीत बाजारात काही खाजगी फायनान्स कंपनीकडून झीरो बॅलन्स व झीरो टक्के व्याजदराने ग्राहकांना पाहिजे त्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे बरेचसे ग्राहक या फायनान्स कंपनीच्या मोहात अडकल्या असल्याचे दिसून येत आहे. या झीरो बॅलन्स व झीरो टक्के व्याजदराने वस्तू मिळत असल्याने सर्वसामान्य माणूस व गरजू ग्राहकांचा कल या कंपनीकडून मोबाईल, फ्रिज, कुलर, टि. व्ही. व इतर सुखवस्तू घेण्याकडे वळला आहे व आज जवळपास साठ टक्के लोक या खाजगी फायनान्स कंपनीकडून सुखवस्तू घेत आहेत.
संबंधित खाजगी फायनान्स कंपन्यांकडून वस्तू घेतांना संबंधित फायनान्स कंपन्या ग्राहकांकडून फक्त आधार कार्ड, ए. टी. एम. व बॅंकेचा ग्राहक नंबर घेऊन पाहिजे ती वस्तू देते. एकवेळ वस्तू घेतल्यानंतर घेतलेल्या वस्तूंच्या रकमेची परतफेड दरमहा ठरवून दिलेल्या तारखेला भरणे गरजेचे आहे. याकरिता एक दिवस अगोदर कंपनीला दिलेल्या बॅंक खात्यात आपण आपली रक्कम जमा करायची असते आपल्या खात्यात रक्कम जमा असली म्हणजे ठराविक तारखेला ऑनलाईन पध्दतीने संबंधित फायनान्स कंपनीकडून हप्त्याची रक्कम वसूल केली जाते. तसेच एखाद्यावेळी काही अडचणी आल्यास एखादा ग्राहक आपल्याकडे घेणे असलेल्या हप्त्याची रक्कम भरु शकत नाही. तेव्हा मात्र संबंधित फायनान्स कंपनीकडून संबंधित ग्राहकाला पुर्व सुचना न देता पाचशे रुपये दंड आकारला जात आहे.
संबंधित कर्जदाराने कर्ज भरणे बंधनकारक व क्रमप्राप्त आहे. परंतु एखाद्यावेळी हप्त्याची रक्कम भरु न शकल्याने किंवा नेटवर्क नसल्यास किंवा काही तांत्रिक कारणांमुळे संबंधित कंपनीला हप्त्याची रक्कम वसूल करतांना अडथळा आल्यास संबंधित कंपनीकडून ग्राहकाला कोणत्याही सुचना न देता थेट ५००/०० रुपये दंड आकारला जातो परंतु हा दंड आकारतांना ग्राहकांकडे हप्त्याची रक्कम १०००/००, १५००/०० किंवा पाच किंवा दहा हजार रुपये असली तरी ५००/०० रुपये दंड आकारला जात आहे. व दंडासहित रक्कम वसुलीसाठी वारंवार फोन करुन संबंधित कर्जदारांना एकप्रकारे घाबरवले जाते. लगेचच दंडासहित हप्त्याची रक्कम वसूल केली जाते.
वास्तविक पाहता हप्ता थकीत झाला म्हणून जर कंपनीकडून ५००/००
दंड वसूल केला जात असेल तर मग संबंधित कर्जदाराला कंपनीकडून पुढील महिन्याच्या हप्त्याची तारीख येईपर्यंत सवलत दिली पाहिजे कारण संबंधित कर्जदार हा ५००/०० दंड भरणार आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे हप्त्याची रक्कम १०००/०० रुपये असली तरीही त्या ग्रासकाला ५००/०० रुपये दंडाच्या रकमेसह एक ते दोन दिवसात हप्ता व दंडाची रक्कम भरायला कंपनी भाग पाडते ही एक गंभीर बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कारण हजार रुपये हप्ता वसुलीसाठी पाचशे रुपये दंड तोही दोन दिवसात भरणे गरजेचे आहे. मग हिशोब काढला तर दोन दिवसात दर शेकडा ५०% व्याज संबंधित कंपनीकडून वसूल केले जात असल्याने एकप्रकारे ही ग्राहकांची लुटच म्हणावी लागेल.
नियमानुसार कर्ज देतांना दर शेकडा व्याज आकारणी केली गेली पाहिजे परंतु या खाजगी फायनान्स कंपन्या मनमानी पद्धतीने दंड वसूल करत असल्याने अशा लुटालूट करणाऱ्या कंपन्यांना शासनाने बंधन घातले पाहिजे अशी मागणी फसवणूक होत असलेल्या असंख्य ग्राहकांनी केली आहे.