काळ आला होता पण वेळ आली नव्हती, मृत म्हणून दवाखान्यात उपचारासाठी नेलेल्या विषबाधित तरुणाला डॉ. सागर गरुड यांनी दिले जीवदान.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२४/०३/२०२३
आजकाल बऱ्याचशा विचित्र व अघटीत घटना घडत असतात. मोठ, मोठे अपघात, सर्पदंश, विषबाधा अश्या अनेक घटना घडतात. मग संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी सुरु होते ती देवाच्या नावाचा धावा करत नातेवाईकांची धावपळ. व उपचारासाठी दवाखान्यात गेल्यावर समोर उभा असतो तो देवमाणूस म्हणजे डॉक्टर म्हणून की काय डॉक्टरांकडे सुध्दा या भूतलावरील देवदूत म्हणून पाहिले जाते.
असाच एक देवदूत पाचोरा तालुक्यातील विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे. विध्नहर्ता म्हणजे संकटाचे निवारण करणारा असेच एक विध्नहर्ता नावाने पाचोरा शहरातील एक नामांकित हॉस्पिटल आहे. या हॉटेलचे संचालक डॉ. मा. श्री. भुषण दादा मगर व डॉ. मा. श्री. सागर दादा गरुड हे जामनेर, भडगाव व पाचोरा तालुक्यातील जनतेसाठी एक मिळालेले वरदानच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कारण या दवाखान्यात रुग्ण गेल्यावर त्याची आर्थिक परिस्थिती पाहून नव्हे तर त्याची प्रकृती पाहून तातडीने उपचार केले जातात यामागील म्हणजे रुग्णाचा जीव हा लाखमोलाचा असतो कारण तो कुणाचा बाप, कुणाचा पती, कुणाचा मुलगा अश्या अनेक नात्यातील तो असतो म्हणून जर, तर ची भाषा न करता अगोदर तपासणी व लगेचच अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार सुरु केले जातात.
असाच एक अनुभव नुकत्याच पहावयास मिळाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील श्री. सुभाष भास्कर पाटील वय वर्षे (४०) या इसमाने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून निराशेच्या भरात कोणतेतरी विषारी द्रव्य घेऊन स्वताला संपवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु ही बाब शेजारच्या व घरातील कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर कुऱ्हाड गावचे माजी उपसरपंच मा. श्री. अशोक देशमुख यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुभाष पाटील याला अत्यवस्थ अवस्थेत पाचोरा शहरातील नामांकित हॉस्पिटल विध्नहर्ता मध्ये दाखल केले. सुभाष पाटील हा दवाखान्यात पोहचला तेव्हा तो जीवंत आहे की नाही ही शंका मनात असल्याने कुऱ्हाड गावातील नागरिक व त्याच्या नातेवाईकांनी सुभाष जीवंत परत येईल की नाही याचा भरवसा वाटत नसल्यामुळे त्यांना देवाचा धावा सुरु केला होता.
सुभाष पाटील याला दवाखान्यात नेल्यानंतर डॉ. सागर दादा गरुड यांनी प्रथम तपासणी केली तेव्हा सुभाष पूर्णपणे बेशुद्ध होता व नाडीचे ठोके जेमतेम होते. ही परिस्थिती पाहून डॉ. सागर दादा गरुड यांनी त्याच्या सोबत आलेले अशोक देशमुख व सुभाषच्या नातेवाईकांना सर्व परिस्थिती सांगितली व पैशासाठी कोणतीही अडवणूक न करता मी प्रयत्न करतो असे सांगून त्वरित उपचार सुरु केले.
डॉ. सागर दादा गरुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व तडकाफडकी उपचार सुरु करुन सुभाषला अतिदक्षता विभागात दाखल करुन सतत तीन दिवस डोळ्यात तेल घालून दिवसरात्र लक्ष देऊन चांगल्याप्रकारे उपचार केल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी सुभाष शुध्दीवर आला. यामुळे डॉ. सागर दादा गरुड यांनी अजूनच चांगले उपचार सुरु करत तब्बल एकवीस दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुभाष पाटील याला यमाच्या तावडीतून सहिसलामत परत आणले.
सुभाष ठणठणीत झाल्यावर त्याची दवाखान्यातून सुट्टी होणार होती. म्हणून सुभाषच्या नातेवाईकांचे किती बिल निघते याकडे लक्ष लागले होते. घरी जाण्यासाठी सुट्टी करण्यासाठी डॉक्टर येणार आहेत ही वेळ जसजशी जवळ येते होती तसतशी उरात धडकी भरली होती. कारण सुभाष हा मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होता व घरातील मुलाबाळांचे व पत्नीचे हाल पहावले जात नसल्याने निराशेतून त्याने स्वताचे जीवन संपवण्यासाठी हे पाऊल उचलले होते.
परंतु सरतेशेवटी ती वेळ येऊन ठेपली डॉ. सागर दादा गरुड व त्यांचा सहकारी हातात एक फाईल व बिल घेऊन आले होते. समोर डॉक्टर व हातात फाईल घेतलेल्या सहकाऱ्याला पहाताच सुभाषच्या नातेवाईकांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. व आशेच्या नजरेने ते दोघांकडे बघत होते. तेवढ्यात डॉ. सागर दादा गरुड यांनी बिलाचा कागद सोबत आलेल्या अशोक देशमुख यांच्या समोर धरला तेव्हा अशोक देशमुख यांनी थरथरत तो कागद हातात घेतला व बिलाची रक्कम पाहिली व तो कागद सुभाषच्या नातेवाईकांच्या हातात दिला बिलावरचा आकडा पाहून सगळे अवाक होऊन बिलाचा आकडा बघतच राहिले व काही न बोलताच सगळ्यांच्या डोळ्यातून अचानकपणे आनंदाश्रू बाहेर पडले.
सुभाषच्या नातेवाईकांनी तर थेट डॉ. सागर दादा गरुड यांच्या पायावर डोके ठेवून हुंदके देत डॉ. सागर दादांच्या बद्दल उफाळून आलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यामागचे कारण होते २१ दिवसांचे बिल अत्यंत कमी होत. या प्रसंगी दवाखान्यात हजर असलेल्या इतर लोकांच्याही चेहेऱ्यावर दादांबद्दल आपुलकी निर्माण झाली होती.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती ~
सुभाष देशमुख याने विष घेतल्यानंतर त्याला जेव्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले तेव्हा सगळ्यांनी तो जीवंत परत येईल याची आशा सोडली होती. सुभाषच्या समोर यमदूत येऊन उभे ठाकले होते. परंतु डॉ. सागर दादा गरुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन यमदूतांना परतून लावत सुभाला जीवदान दिले ही परिस्थिती पाहता काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.