शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात वृक्ष दत्तक योजनेची उत्साहात सुरुवात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२२
एका बाजूला झपाट्याने होणारी वृक्षतोड तर दुसऱ्या बाजूला स्वयंचलित वाहनांची वाढणारी संख्या यातून वातावरणात सोडला जाणारा मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज हजारो एकर शेतजमीनीचे विगर शेतीत होणारे रुपांतर, मोठमोठे कारखाने, रस्ते व विविध कारणांनी झपाट्याने कमी होणारी निसर्ग संपदा व यातूनच उद्भवणाऱ्या विविध समस्या यात वातावरणातील झपाट्याने कमी होणारी ऑक्सिजनची पातळी व ओझोन वायूचा स्तर, वाढती उष्णता, दिवसेंदिवस कमी होणारे पावसाचे प्रमाण असे निसर्गाचे बिघडणारे संतुलन पाहाता आजच्या परिस्थितीत वृक्षलागवड, वृक्ष संगोपन करून निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे.
म्हणून जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालयातर्फे आज “वृक्ष दत्तक योजनेची” उत्साहात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील मा. कुलगुरू निर्देशित साहित्य खरेदी अंकेक्षण समितीतील राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिनजी नांद्रे, तसेच वित्त व लेखा विभागातील श्री. शरद पाटील व श्री. महेंद्रसिंग पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश प्रकाश पाटील, प्रा. अमर जावळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वसंत एन. पतंगे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. गवारे हे उपस्थित होते.
याप्रसंगी या वृक्ष दत्तक योजनेअंतर्गत डॉ. सचिनजी नांद्रे व प्राचार्य डॉ.वासुदेव आर. पाटील यांच्या हस्ते सागर पाटील या विद्यार्थ्यास त्याच्या वाढदिवसानिमित्त रोपटे देण्यात आले व त्यास ते रोपटे जगवण्याची शपथ देण्यात आली. तसेच रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांना सुद्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदे आर. पाटील यांच्या हस्ते रोपटे देऊन महाविद्यालयाच्या वृक्ष दत्तक योजनेस सुरुवात करण्यात आली.
महाविद्यालयातील या योजने अंतर्गत विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर बांधव यांच्या वाढदिवसानिमित्त व इतर प्रसंगानुरूप रोपटे महाविद्यालयाकडून दिले जाणार असून त्याची देखभाल संबंधित वृक्ष दत्तक घेणाऱ्या व्यक्तीने करावयाची आहे. या विषयीचा आढावा महाविद्यालयातिल तज्ञ समिती काटेकोरपणे घेणार आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक महेंद्र घोंगडे, प्रतीक बोरसे, निलेश बारी, अक्षय पवार, सागर पाटील, हरीश कोळी हे विद्यार्थी उपस्थित होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व आय. क्यू. ए. सी. च्या वतीने करण्यात आले आहे.