बि, बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवा, महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०६/२०२३
पारोळा तालुक्यात बी, बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवून कृषी केंद्र चालकांची दुकाने व गोदामांची तपासणी करून कारवाई करून मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी पारोळा तालुका कृषी अधिकारी कु. आरती साळी तहसीलदार हे शासकीय कामानिमित्त जळगाव येथे गेले असल्याने त्यांच्या प्रतिनिधींना देत शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचण्यासाठी निवेदनाव्दारे केली आहे.
पारोळा तालुका हा कृषी क्षेत्राची खूप मोठी बाजारपेठ असून यामध्ये खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांची संख्या खूप जास्त आहे. बाजारपेठ असल्याकारणाने शेतकऱ्यांचे हित साध्य झालं पाहिजे अशी अपेक्षा असते, परंतु आपल्या शहरात तालुक्यात शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे. कापूस बॅगांची शासकीय किंमत ८५३/०० रुपये आहे. परंतु काही कृषी केंद्राचे संचालक कापूस बियाणे उपलब्ध असतांनाही कृत्रिम टंचाई भासवून वेगळ्या पध्दतीने म्हणजे मागच्या दाराने ८५३/०० रुपये किंमतीची कापूस बियाण्याची थैली १२००/०० ते १५००/०० रुपये घेऊन चढ्या भावाने विक्री करत असल्याचे दिसून येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तसेच रासायनिक खतांच्या बाबतीत शेतकरी ज्या खताची मागणी करतात त्या खतासोबत दुसरी म्हणजे दोन बॅगांवरती एक बॅग बळजबरीने दिली जाते. जी शेतकऱ्याला नको असते परंतु जर शेतकऱ्यांने घेण्यास नकार दिला तर आमच्याकडे कोणतेही खते शिल्लक नसल्याबाबत दुकानदारांकडून सांगितलं जाते. सोबतच खतांची कृत्रिम टंचाई भासविण्यात येत असून कृषी केंद्र संचालकांनी शहरासह तालुक्यातील काही खेड्यात शासनाला माहीत नसलेले गोदाम घेऊन त्यात मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवला आहे.
याची कल्पना शासनाला आहे का ? शासनाला अंधारात ठेवून इतर गोदामांमध्ये खूप मोठा खतांचा साठा शिल्लक असल्याबाबत संघटनेला कळते पण शासनाला का कळत नसावे का ? आणि यासंदर्भात कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने खताची लिंकिंग करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचे कटकारस्थान कृषी केंद्र संचालक करताना दिसत आहेत असा आरोप महाराष्ट्र शेतकरी संघटनांनी केला असून
आम्ही तक्रार केल्यानंतरच आपण चौकशी कराल का असा प्रश्न उपस्थित केला करत जबाबदार कृषी विभागाने सरसकट सर्व कृषी केंद्राची माहीत असलेल्या व माहिती नसलेली गोदामांची तपासणी करून तात्काळ कारवाई करावी व आम्हा शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा संघटनेचा व शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन, प्रशासनच जबाबदार राहील याची विशेष करून नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.
आताच बियाणे व खतं खरेदी करण्याची वेळ असून आपण आज पासून पाच दिवसांच्या आत कारवाई करण्यासाठी आपण सर्व कृषी केंद्र व कृषी केंद्राच्या गोदामांची झाडाझडती घेऊन कारवाई करावी अन्यथा संघटना अती तिव्र पध्दतीने आंदोलन करेल याची दखल घ्यावी असे निवेदनात नमूद केले असून निवेदन देतेवेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, महाळपुर शाखाध्यक्ष शांताराम पाटील, बाभळेनाग शाखा प्रमुख मयूर ठाकूर, बाभळेनाग शाखा उपाध्यक्ष सागर माळी,आरोग्य प्रमुख देवेंद्र पाटील,इटवे शाखाध्यक्ष दिनेश शेलकर,दिपक पाटील, अनिल पाटील, मुजाहिद खाटीक यांच्या सह असंख्य शेतकरी उपस्थित होते.