नापिकी व कर्जाला कंटाळून नाईक नगर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील नाईक नगर येथील एका ३४ वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे हातात अपेक्षित उत्पन्न न आल्याने व यातूनच संसाराचा गाडा ओढतांना डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेल्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील नाईक नगर येथे दोन एकर शेतजमीन असलेला अल्पभूधारक शेतकरी अनिल शिवदास चव्हाण वय ३४ यांच्या शेतातील पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे हाती न आल्याने तसेच आय.सी.आय. बँकेचे तीन लाख रुपये, महिंद्रा फायनान्सचे दीड लाख रुपये व खाजगी सावकारांचे दोन लाख रुपये कर्ज देणे होते.
डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व अतिवृष्टीने हातात आलेले पीक नष्ट झाल्याने संसाराचा गाडा ओढणे मुश्कील झाल्याने हतबल होऊन दिनांक १५ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी स्वताचे शेतात कोणतेतरी विषारी पदार्थ सेवन केल्याने त्याला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा पत्नी असा परिवार आज उघड्यावर आला आहे. तरी शासनाने योग्य ती मदत करावी अशी मागणी नाईक नगर ग्रामस्थांनी केली आहे.