सावधान जगवाल तर जगाल जल, जमीन अन् जंगले धोक्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२१
दरवर्षी ५ जून हा दिवस जगामध्ये सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने ५ जून १९७४ पासून या पर्यावरण दिनाची सुरुवात केली आहे. या पर्यावरण दिनाचा उद्देश सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन करावे यासाठी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये जनजागृती करणे हा आहे. कोरोनाच्या या संकट समयी या वर्षाच्या पर्यावरण दिनाची थीम “इकोसिस्टीम पुन्हा स्थापित करणे” ही आहे. आजच्या वर्तमानात पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणात साजरा करणे आवश्यक असून वर्षभर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व सुंदर पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्याचे पालन करून पृथ्वीला निसर्ग स्वर्ग बनवण्याचा संकल्प या पर्यावरण दिनी आपण सर्वजण करू या. जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. यापैकी कोणत्याही घटकाला झालेली इजा, पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. मानव जल, जमीन आणि जंगलावर करत असलेल्या अत्याचारातून या संजीव सृष्टीला अपंग बनवत आहे. पर्यावरणाचा कारण कळत नाहीत पण परिणाम मात्र निश्चित कळतात. हे वर्तमानातील संकटाने मानवाला दाखवून दिले आहे. त्यामुळे “निसर्ग देव भव:” या संस्कृतीचे पालन केले तर उद्याचा सुर्योदय होणार आहे नाही तर सर्वनाश हा अटळ आहे.
पर्यावरण
पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या आवरणास पर्यावरणाचे म्हणतात. पर्यावरणामध्ये जलावरण शिलावरण वातावरण आणि जीवावरण या आवरणाचा समावेश होतो. समस्त संजीव सृष्टीचा आधार जल, जमीन आणि वायू आहेत. पर्यावरणात परिवर्तन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अनादि अनंत काळापासून ती चालत आली आहे. संजीव सृष्टीला पोषक असणारे पर्यावरण शुद्ध पर्यावरण तर संजीव सृष्टीसाठी घातक ठरणारे पर्यावरण प्रदूषण पर्यावरण ठरत असते.
परिसंस्था
हा पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परिसंस्थेत संजीव यामध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. तर अजैविक घटकामध्ये हवा, पाणी, माती आणि खनिज यांचा समावेश होतो. संजीव आणि अजैविक घटकांच्या परस्पर संबंधातून परिसंस्था निर्माण होत असते. पर्यावरणाच्या अन्नसाखळीत तृणभक्षक म्हणजेच वनस्पतीवर जगणारे, तृणभक्षकांना खाणारे मांसभक्षक, तृणभक्षक व मांसभक्षक या दोन्हींना खाणारे सर्वभक्षक आणि संजीवाच्या मृत्यू नंतर त्याचे असेंद्रीय संयुगात रूपांतर करणारे अपघटक. असे मिळून अन्नसाखळी तयार झाली आहे. या अन्नसाखळी प्रत्येक घटक अत्यंत महत्त्वाचा असून वनस्पती व प्राणी यांच्या संख्येतील असंतुलनच पर्यावरणीय ऱ्हासस कारणीभूत ठरत आहे.
प्रदूषण
जलावरण, शिलावरण व वातावरण यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांमध्ये अनपेक्षित परिणाम होऊन त्याचा परिणाम मानवासह व संजीव सृष्टीवर घातक प्रमाणात होत असतो. यालाच प्रदूषण म्हणतात. प्रदूषणासाठी जबाबदार प्रदूषक घटक असतात. यामध्ये दळण – वळणासाठीची वाहने, औद्योगीकरण व विविध क्षेत्रात रासायनिक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर. यामुळे जल, जमीन आणि वायू यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याचा परिणाम जमिनीचे आरोग्य, जलाची शुद्धता आणि वातावरणामधील वायूचे वाढणारे व कमी होणारे प्रमाण यावर होत आहे. मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचे घातक परिणाम आज सर्व संजीव सृष्टी भोगत आहे. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानव असला तरी पर्यावरण प्रदूषणासाठी तोच सर्वात शक्तिशाली कारक ठरला आहे. हे मान्यच करावे लागेल.
(स्वयंचलित वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या व यातून निघनारा कार्बन-डाय-ऑक्साइड हे घातक आहे.)
जागतिक पर्यावरण समस्या
मानवनिर्मित प्रदूषक घटकाचे घातक परिणाम पर्यावरणावर होत आहेत. पर्यावरण हे जागतिक असल्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा समस्त जगास भोगावे लागत आहेत. आज जगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेली वाहनांची संख्या, वाढते औद्योगीकरण, ऊर्जानिर्मिती प्रकल्प यामुळे होणारे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण. यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व मिथेन या वायूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पृथ्वीपासून उत्सर्जित होणारी ऊर्जा या वायूमध्ये साठवली जात आहे. तसेच प्रदूषित घटकामुळे पृथ्वीचे कवच असणारा ओझोनचा थराचाही ऱ्हास होत आहे. यामुळे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे पृथ्वीवर सरळ पोहोचत आहेत. या दोन्हीचा परिणाम जागतिक तापमान वाढ होण्यावर झाला आहे. ही एक वर्तमानातील जगासमोरील अत्यंत ज्वलंत अशी समस्या बनली आहे. याचे परिणाम निसर्ग संपत्तीचा ऱ्हास, पर्यावरण ऱ्हास, महापूर, चक्रीवादळे दुष्काळ, जंगलातील वनवे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील होणारी वाढ, ऋतुचक्रातील बदल, विविध प्रकारची महामारी. अशा भयानक संकटांनी अनेक वनस्पती, पशु – पक्षी यांच्या जाती नष्ट केल्या आहेत. आणि आता त्याची भयानकता मानवाच्या अस्तित्वावरच घाला घालत आहे.
ऑक्सिजन – जंगले पर्यावरणाचे फुप्फुसे आहेत. संबंध जीवासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा वायू आहे. तो सजीवाचा प्राण आहे. वनस्पती हा ऑक्सिजन निर्मितीचा हा मुख्य स्रोत आहेत. म्हणजे जंगल हे ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने आहेत.
पण मानव विकासाकडे धावत असतांना या जंगलाचा फार मोठ्या प्रमाणात त्याने विनाश केला आहे. म्हणजेच मानवाने पर्यावरणाच्या फुफ्फुसावर फार मोठ्या प्रमाणात आघात केला आहे. त्यामुळे आज शुद्ध ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. कारण पर्यावरण प्रदूषित झाले आहे. ऑक्सिजनचे असलेले महत्त्व वर्तमानात सगळ्यांनाच कळाले आहे. कारण मानवाने गृहीतच धरलेले ऑक्सीजनने त्याचे अस्तित्व दाखवून दिले आहे. ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत वृक्ष आहेत. आज जगातील लोकसंख्या ७ अब्ज ६ कोटी आहे. प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावले व त्याचे संवर्धन केले तर जगात दर वर्षी सरासरी पाच अब्ज एवढी झाडांची जंगल निर्माण होईल. भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या १ अब्ज ३४ कोटी आहे. प्रत्येक भारतीयांनी भारत मातेच्या सेवेसाठी म्हणून एक झाड लावले, तरी दरवर्षी अब्जावधी झाडांचे जंगल या भारत भूमीवर तयार होईल आणि पुढे येणाऱ्या अनेक गंभीर संकटावर मात करणे शक्य होईल. यासाठी दूरदृष्टी, इच्छाशक्ती, निसर्ग प्रेम आणि सेवाभावी वृत्तीची आवश्यकता आहे. ती राजकीय, सामाजिक आणि उद्योगपतींकडे यांच्याकडे आली. तरच हे पर्यावरणाचे फुफ्फुसे टिकून मानवाचे फुफ्फुसे कार्यरत राहतील. निसर्ग देवो भव:, निसर्ग प्रेम हा शाश्वत विकासाचा मार्ग आहे. मानवाने निसर्गाशी समन्वय साधला नाही तर, येणारी संकट यापेक्षाही भयानक असू शकतात. त्यामुळे प्रत्येक मानवाने निसर्गाला आपला मित्र बनवुन, इको-फ्रेंडली जीवन पद्धतीचा स्वीकार करून, पुन्हा एकदा या निसर्गला स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार करू या.
सावध ऐका पुढल्या हाका
दीड वर्षापासून जगावर कोरोनाने थैमान घातले आहे. अस्तित्वाने व आकाराणे अत्यंत सूक्ष्म असणारा हा कोव्हीड – १९ चा विषाणू अफाट बुद्धिमान, हुशार आणि शक्तिशाली असलेल्या मानवाला अक्षरशः पराजित करतो आहे. यापूर्वीही जगात अनेक संकटे, महामारी आल्या पण ही महामारी “न भूतो न भविष्यती” अशी आहे. कारण रात्र दिवस बेभानपणे धावणाऱ्या मानवाला कोरोनाने स्तब्ध करून ठेवले आहे. या महामारीत विकसित देश सुद्धा धारातीर्थी पडले आहेत. या महामारीने समस्त जगासाठी एक स्पष्ट संदेश दिला आहे. तो मानवाने समजून घेऊन, आपल्या वृत्तीत आणि कृतीत सुधारणा करणे वर्तमानाची गरज व भविष्याची मागणी आहे. या निसर्गाची इकोसिस्टीम पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिनी आपन सर्वजन करू या.
“वृक्ष आहेत तर ऑक्सिजन आहे, ऑक्सीजन आहे तर मानव आहे…!”.
चौकट
जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. यापैकी कोणत्याही घटकाला झालेली इजा, पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. मानव जल, जमीन आणि जंगलावर करत असलेल्या अत्याचारातून या संजीव सृष्टीला अपंग बनवत आहे. पर्यावरणाचा कारण कळत नाहीत पण परिणाम मात्र निश्चित कळतात. हे वर्तमानातील संकटाने मानवाला दाखवून दिले आहे. त्यामुळे “निसर्ग देव भव:” या संस्कृतीचे पालन केले तर उद्याचा सुर्योदय होणार आहे नाही तर सर्वनाश हा अटळ आहे.
(वाचनात आलेली माहिती संकलित करून आपल्यासमोर ठेवत आहे.)