चारचाकीच्या अपघातात पत्नीचा मृत्यू पती मात्र सुखरूप, घातपात की अपघात ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०५/२०२१
पत्नीचा खून करून अपघाताचा केला बनाव केल्याचा मयत अश्विनीच्या आईवडीलांचा आरोप : आरोपी पती कोरोना पॉझिटीव्ह !
चारचाकी वाहन पलटवून आपली पत्नी अपघातात ठार झाल्याचा बनाव करण्यात आला आहे.असा आरोप करत मयत अश्विनीच्या आईवडीलांनी या प्रकरणी पतीसह त्याच्या घरच्या मंडळीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा असा हट्ट धरला असून अद्यापपर्यंत पोलिस स्टेशनकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
मात्र दुसरीकडे अटक करण्यात आलेला संशयित पती हा कोरोना पॉझिटीव्ह आल्याने या प्रकरणाचा गुंता चांगलाच वाढला आहे.
पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनीत वास्तव्यास असलेल्या २३ वर्षाच्या विवाहीतेस पतीने जीवे ठार मारून अपघाताचा बनाव करत असल्याचा आरोप असलेल्या आरोपी पतीने मयत पत्नीस सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचारी असलेल्या बहिणीच्या घरी नेण्याचा बहाणा करून पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव गावाजवळ वाहनाचा खोटा अपघात घडविला. त्यात पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची खबर पत्नीच्या वडिलांना दिली. मात्र वाहन पलटी होऊनही पतीस साधे खरचटले सुध्दा नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय बळावून व मयताच्या आईने माझ्या मुलीला जावयाने प्रथम वाहनातच जीवे ठार मारले. व त्यानंतर वाहन पलटी केले अशी फिर्याद दिल्याने पतीसह पाचोरा पोलीस स्टेशनला पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीस ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा शून्य क्रमांकाने पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा शहरा लगत असलेल्या राजीव गांधी कॉलनीतील रहिवाशी मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे) याचा विवाह धुळे येथील साई प्रसाद कॉलनी येथील अश्विनी दिपक शेलार हिचे सोबत दि. १४ मे २०१९ रोजी पाचोरा येथे मोठ्या थाटात झाला होता. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांनी अश्विनी हिचा पती, सासू व नणंद यांनी छळ सुरु केला. तसेच पती मुकेशने नासिक येथील कुंदा भागवत सहाणे हिच्याशी माझे प्रेम संबंध आहेत. मला तु आवडत नाही. असे सांगितले. तद्नंतर अश्विनी ही सासरी नांदत असतांनाच कुंदा सहाणे ही पाचोरा येथे येऊन राहू लागली व त्यांनतर अश्विनी हिला तिघी नणंदा व सासू नेहमी हिणवुन व शिवीगाळ करून मारहाण करू लागल्या. तर पती मुकेश याने स्विफ्ट डिझायर गाडी घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर मी तुला मारून टाकेल अशी धमकी देत असल्याने अश्विनी हिने तिची आई संगीताबाई दिपक शेलार हिस भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.
दरम्यान, काही दिवसांनी मुलीस जास्तच त्रास होत असल्याने मुलीचे आई – वडील पाचोरा येथे येऊन मुकेश, सुमनबाई रमेश सोनवणे (आई), सविता दिनेश मराठे (नणंद), कविता रमेश सोनवणे (नणंद), रेखा वाडेकर (नणंद) यांची समजूत घालत असतांना त्यांनी काही एक ऐकून न घेता तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये आणून द्या नाहीतर आम्ही मुकेशचे लग्न कुंदा भागवत सहाणे हिच्याशी लावून देऊ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे तिच्या पालतकांनी आपल्या मुलीला धुळे येथे नेले. त्यांनतर २२ एप्रिल २०२१ रोजी मुकेश मिस्त्री (सोनवणे) हा धुळे येथे येऊन मी अश्विनीला यापुढे चांगले वागवेल असे लेखी हमीपत्राद्वारे लिहून दिल्यानंतर त्यांनी अश्विनीला पाचोरा येथे पतीसोबत पाठविले.
दरम्यान मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे) हा दि. २३ मे रोजी रात्री सोयगाव येथे राहत असलेल्या त्याची बहीण कविता रमेश सोनवणे हिच्याकडे भेटायला अश्विनी हिस घेऊन जाण्याचा बहाणा करून एम. एच. १५ ई. ई. ०७८७ (क्रेटा) या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून घेऊन गेला. थोड्याच वेळात पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव गावापासून काही अंतरावर जोगे फाट्याजवळ गाडी पलटी होऊन त्यात अश्विनीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे सासरे दिपक पांडुरंग शेलार यांना कळविले. यामुळे तिच्या माहेरच्या मंडळीन पाचोरा येथे धाव घेतली.
गाडी पलटी होऊन या अपघातात अश्विनीच्या तोंडावर, डोक्यावर,उजव्या हातावर, पाठीवर कानशिलाजवळ मोठ्या प्रमाणात खोल जखमा आढळून आल्या व तीच्या डोक्याची कवटी फुटल्यामुळे तीचा जागेवरच मृत्यू झाला असे सांगितले गेले मात्र हिच गाडी चालवणारा मुकेश यास साधे खरचटलेले सुध्दा दिसून न आल्याने अश्विनीचा हा अपघात नसून तिचा
घातपात करून खून करण्यात आला आहे असा आरोप अश्विनीची आई सौ.संगिता दिपक शेलार हिने केला असून अश्विनीच्या मृत्यूस कारणीभूत असलेला तीचा पती मुकेश रमेश मिस्री (सोनवणे) सासू सुमनबाई रमेश सोनवणे (रा.पाचोरा), नणंद सविता दिनेश मराठे (रा.भडगाव), रेखा वाडेकर (रा.जळगाव), कविता रमेश सोनवणे (रा. सोयगाव) आणि कुंदा भागवत सहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अश्विनीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे.
मयत अश्विनीचे शवविच्छेदन धुळे येथे व्हावे आई वडिलांची मागणी
अश्विनी मुकेश सोनवणे हिचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूदेह दि.२४ रोजी मध्यरात्री पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सायंकाळ होऊनही तिचे वडील दिपक पांडुरंग शेलार यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील मेडिकल कॉलेजात नेणार असल्याचा हट्ट धरला आहे. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू न देण्याचा आग्रह धरल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते.
आरोपी पतीला कोरोनाची लागण वैद्यकीय अहवालाबद्दल नातेवाईकांना संशय.
मयत अश्विनी हिचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मुकेश याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने मला कोरोना झाल्याचा भास होत असून मी दोन दिवसांपूर्वी स्वॅब दिलेला आहे. असे सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची रॅपिड टेस्ट करून घेतली असता त्यात मुकेश याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. यामुळे आता त्याला रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या अहवालाबद्दल अश्विनीच्या नातेवाईकांना संशय असून आरोपी हा आपला बचाव करण्यासाठी ही खेळी खेळत असल्याचे म्हणने आहे.
(बातमी लिहून होईपर्यंत पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी रीतसर कामकाज सुरु होते.)
सविस्तर बातमी उद्या.