पाचोऱ्याचे भूमी अभिलेख कार्यालय ‘राम’ भरोसे, लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२१
पाचोरा तालूका भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून कार्यालायाचा प्रभार असलेले उपअधीक्षक भगवान भोये यांचेकडे पाचोरा व चाळीसगाव असा संयुक्त कार्यभार असल्याने कार्यालय जणू ‘ राम भरोसेच’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.येथील शहर भूमापक पी. व्ही. कुलकर्णी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील आलेल्या नागरिकांची कामे आर्थिक तडजोडी शिवाय होत नसल्याच्या तक्रारी असून जनतेला किरकोळ कारणांसाठी सतत कार्यलयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने नागरिकांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
वरिष्ठांनी येथील काकाजात सुसूत्रता आणत पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.
कार्यालयातील अनेक कर्मचारी बाहेर गावाहून उपडाऊन करत असल्याने देखील त्यांना अनेकदा कार्यालयीन वेळेत पोहचणे शक्य होत नाही तसेच संध्याकाळी घरी जाण्याच्या घाई मूळे जनतेची दैनंदिन कामे बाधित होते असल्याचे चित्र आहे.शहर भूमापक व उपअधीक्षक हे कामकाजा संबंधी एकमेकांकच्या मागे लपत जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच उपअधीक्षक भोये यांच्या उर्मटपणामुळे देखील अनेक वेंडर बांधवांसह नागरिक त्रस्त झाले असून कोणाचेही फोन न स्विकारणे, पाचोऱ्या सारख्या मोठे कार्यक्षेत्र असलेल्या तालुक्याला अधिकाऱ्याने आठवड्यातून केवळ एकच दिवस वेळ देणे ते देखील संयुक्तिक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.यापूर्वी देखील अशाच अनेक तक्रारींमुळे शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांनी कार्यालयाला कुलूप ठोकत आंदोलन केले होते तर काही वर्षापूर्वी काम होत नसल्याने अनोख्या पद्धतीने अर्धनग्न आंदोलन करत खळबळ निर्माण केली होती. तरीही या कार्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
म्हणून आतातरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोक प्रतिनिधींनी या प्रकरणी लक्ष घालुन कामकाजात सुसूत्रता आणत याठिकाणी होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालावा अशी मागणी होत आहे.