गावठी दारुच्या भट्ट्या फोडण्यासाठी पोलीस गाळत आहेत घाम, दारुबंदी अधिकारी मात्र मोजत आहेत का दाम ? सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२४
सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सर्वच प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. या अवैध धंद्यांपैकी जळगाव एल. सी. बी. पथकाकडून पाचोरा व भडगाव तालुक्यातील गावठी हातभट्ट्यांची तोडफोड करण्यात येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील टोनगाव, पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी व राणीचे बांबरुड येथे जळगाव एल. सी. बी. पथकाने धाडसत्र राबवून सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे गावठी दारुची निर्मिती करण्यासाठी लागणारे कच्चे व पक्के रसायन नष्ट केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या गावठी दारुच्या निर्मीती व विक्री विषयावर बोलायचे झाल्यास सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात खेड्यापाड्यात गावठी दारुची निर्मिती व विक्री राजरोसपणे सुरु आहे. या गावठी दारुच्या निर्मीती व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र दारुबंदी विभाग कार्यान्वित आहे. मात्र दारुबंदी विभागाकडून आजपर्यंत तिघेही तालुका गावठी दारुची निर्मिती व विक्री थांबवण्यासाठी ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणून अवैध दारुची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याची दखल घेऊन जळगाव एल. सी. बी. मार्फत कारवाई करणे भाग पडले असल्याचे जनमानसातून ऐकावयास मिळत आहे.
तर दुसरीकडे दारुबंदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी या गावठी दारुच्या निर्मीती व विक्री कडे अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला असून जर का दारुबंदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी फक्त नावापुरतेच असतील तर या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे असे मत सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे दारुबंदी विभागाकडे याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे मनुष्यबळ अत्यंत तोडके असल्याचे सांगून हात झटकले जातात परंतु (इच्छा असली तर मार्ग सापडतो) या म्हणीप्रमाणे जर दारुबंदी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावठी दारुची निर्मिती व विक्री थांबवण्यासाठी कारवाई करायची असेल तर ते पोलीसांची मदत घेऊन संयुक्तपणे कारवाई करु शकतात
परंतु आजपर्यंत दारुबंदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशी कोणतीही तजवीज केली नसल्याने या अवैध धंदे करणारांची व दारुबंदी विभागाची जुगलबंदी असल्याच सर्वसामान्य जनतेचा आरोप योग्य आहे की काय अशी शंका निर्माण होते.
या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यास नक्कीच (गावठी दारुच्या भट्ट्या फोडण्यासाठी पोलीस गाळत आहेत घाम, दारुबंदी अधिकारी मात्र मोजत आहेत का दाम ?) अशी शंका निर्माण होते व तशी चर्चा सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.