चिंचपूरा येथील गायराण जमीनीवर लावलेल्या बांबूची विक्री केल्यास, आंदोलन छेडण्याचा निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा इशारा .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनमानी कारभार सुरू केला असून गरज नसतांना चिंचपूरा गावाच्या पन्नास एकर गायराण जमीनीवर लावलेले बांबू विकण्याचा ग्रामसभेत एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाला गावातील निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी त्याच ग्रामसभेत या बांबूच्या विक्रीसाठी विविध दर्शवत जवळपास शंभराहून अधिक सह्यांचे निवेदन देऊन बांबूचे बन विक्री करु नये अशी हरकत घेतली आहे. परंतु तरीही “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” अशा पध्दतीने सरपंच पती यांनी ग्रामसभेत हस्तक्षेप करत बांबूचे बन विकण्याचा घाट घातला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मात्र या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिक लवकरच जिल्हाधिकारी जळगाव, कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार आहेत. कारण या बांबूची विक्री झाल्यास गावाच्या सार्वजनिक मालमत्तेचे व निसर्गाचे नुकसान होणार असून या बांबूच्या बनात असलेले चिमणी, कावळे, मोर, लांडोर, करकोचा असे विविध जातीचे हजारो पक्षी तसेच कोल्हे, लांडगे या प्राण्यांच्या निवारा हिरावला जाईल तसेच एकुण ८० एकर गायराण जमिनी पैकी तीस एकर जमिनीवर काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून हडप केली आहे. आता जर हे बांबू काढले तर या जमिनीवर अतिक्रमण होईल व गायराण जमीन शिल्लक राहणार नाही म्हणून बांबू कापण्यात येऊ नये असे चिंचपूरा येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून जवळपास शंभर सह्यांचे निवेदन देऊन बांबूच्या लिलावाला विरोध दर्शविला आहे.
विशेष म्हणजे याबाबतचे वृत्त संकलनासाठी सत्यजित न्यूज प्रतिनिधी चिंचपुरा गावात गेले असता सरपंच पती भागवत पंडित पाटील यांनी ९४२२५६९९०७ या भ्रमणध्वनी क्रमांकावरुन सत्यजित न्यूज संपादक दिलीप जैन यांच्या ९९७५६६६५२१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला व या बांबूच्या बनाला आग लागली तर आम्ही तक्रारदारांनी आग लावली असा आरोप करुन गुन्हा दाखल करु अशी एकप्रकारे धमकी दिली आहे. या संभाषणाची ध्वनिफीत सत्यजित न्यूज कडे संग्रहित ठेवण्यात आली आहे. भविष्यात राजकीय वातावरण तापवून आपला हेतू साध्य करण्यासाठी कदाचित आग लावून तक्रारदाराला वेठीस धरु शकतात अशी शंका निर्माण झाली आहे.