पाचोरा येथे उद्या श्री. बालाजी रथयात्रा महोत्सव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/११/२०२३
सांस्कृतिक उत्सव हे आपणांस वैभवशाली इतिहासाचे स्मरण करुन देतात त्यात यात्रा हे उत्सव महत्वाचे असतात आपण उत्सवात सहभागी होतो तेव्हा कळत नकळत आपल्या परंपेरची जोपासन करीत असतो व या सांस्कृतिक परंपरेचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. असाच एक उत्सव पाचोरा येथील सुमारे १९० वर्षाची परंपरा असणारा श्री. बालाजी महाराजांचा रथयात्रा उत्सव कार्तिक शुध्द चतुदर्शी म्हणजे बैकुंठ चतुदशीला असतो या वर्षी सदर रथयात्रा व मिरवणुक उत्सव दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रविवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
पाचोरा येथील रथयात्रा निमित्ताने शुभेच्छा देतांना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी.
यानिमित्ताने श्री. बालाजी महाराज यांची मुर्ती रथात बसवुन लेझीम ढोल, ताश्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात येणार असून या भव्य मिरवणुकीची सुरुवात दुपारी दोन वाजता रथ गल्लीतील श्री. विठ्ठल मंदिरापासून निघणार असून पुढ रथ गल्लीतील विठठल मंदीर रोड, तलाठी कार्यालय जामनेर रोड, महात्मा गांधी रोड या मार्गावरुन काढण्यात येणार असून या परत रथगल्ली येथे रात्री १० वाजता रथयात्रेची सांगता करण्यात येणार आहे.
या रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री. बालाजी महाराजांचा भव्यदिव्य रथ हा दोर बांधुन लोकसमुहाद्वारे श्री. बालाजी महाराज की जय या घोषणेच्या निनादात ओढला जातो. मिरवणुकीत शहरातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात या उत्सवाच्या निमित्ताने गांधीचोक, जामनेर रोड, शिवाजी चौक या भागात मोठी यात्रा भरते या रथयात्रेत भाविक भक्त श्री. बालाजी महारांजाना आरती ओवाळून भाविक भक्त प्रसाद म्हणून केळी व नारळ अर्पण करतात.
(या रथयात्रेबाबतची आख्यायिका)
अशी की सुमारे इ. स. १५६० च्या सुमारास तामसवाडी ता. पारोळा येथील स्थानिक श्री. पिलाजी पाटील हा गावक-यांना त्रासदायक ठरला होता. म्हणून गावकऱ्यांनी कोल्हापुरकर महाराजांकडे संरक्षणाची मागणी केली. सदर विनंती वरुन महाराजांनी सरदार घराण्यातील श्री. अर्जुन पाटील यांना तामसवाडी येथे त्यांचे प्रतिनिधी म्हणून कारभार करण्यास पाठविले असता त्यानी श्री. पिलाजी पाटील यांचे नामोहरण करुन गावांत शांतता प्रस्थापित केली तेव्हा त्यांना मुलकी आणि पोलीस पाटीलकी अश्या दोन्ही पदव्या बहाल करण्यात आल्यात. कालातंराने दुष्काळ पडल्याने अर्जुन पाटील यांच्या घराण्याची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने त्यांचे वंशज श्री. रामा पाटील व त्यांचे पाच भाऊ हे पारोळा येथून पाचोरा येथे स्थायीक झाले.
थोड्याच दिवसात त्यांनी मेहनतीने व सदगुणांनी शेती, संपत्ती व प्रतिष्ठा मिळविली व ते एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाऊ लागले, रामा पाटील यांचे भाऊ शामा पाटील हे दरवर्षी दिंडीसोबत पायी श्री. क्षेत्र पंढरपुर येथे वारी करीत असत. एकदा ते पंढरपुर येथे वारीसाठी गेले असता चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या प्रवाहात हात घातला असता त्यांच्या हाताला श्री. बालाजी महाराजांची दगडी मुर्ती लागली. परमेश्वर प्रसन्न झाला या भावनेने त्यांनी ती मुर्ती दिंडीसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात पाचोरा येथे आणली व घडलेला वृतांत आपल्या भावांना सांगितला.
श्री. शामा पाटील यांना मुलबाळ नसल्याने त्यांच्या वाटयाला जी संपत्ती आली तिचा विनियोग सर्व भावांनी पाचोरा येथे श्री. बालाजी मंदीर व रथ तयार करण्यासाठी केला. काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगांव राजा येथील पंडीत व महंताना बोलावुन सदर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येवून रथ यात्रा व मिरवणुक उत्सव सुरु करण्यात आला, तेव्हा पासुन ते आजतागायत सदर उत्सव हा मोठ्या उत्साहात व आनंदात सुरु आहे.
श्री. बालाजी महारांजाचा रथ हा त्याकाळी पाचोरा, पारोळा व नगरदेवळा येथील कुशल कारागीरांनी सागवानी लाकडापासुन तयार केला असुन रथाची उंची ३० फुट इतकी आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे. रथाचे दिवशी रथाचे वर कळस ठेवला जातो तर अग्रभागी लाकडी घोडे व सारथी म्हणुन श्री. अर्जुनाची मुर्ती बसविली जाते त्याचे दोनही बाजुस चोपदार यांच्या मुर्त्या उभ्या केल्या जातात तसेच मागील बाजुस राक्षसाच्या मुर्त्या उभ्या केल्या जातात. पुढील भागी कळसाचे खाली परी व श्री. हनुमानजी यांच्या मुर्ती बसविल्या जातात. रथ मिरवणुकीचे दिवशी रथाचे चारही बाजूस भगवे निशाण, ध्वज, केळीचे खांब, उस, झेंडुच्या फुलांच्या माळा लाऊन रथ आकर्षक व सुशोभित केला जातो. तसेच विजेची रोषणाई केली जाते वरील प्रमाणे रथ सजविण्याचे अगोदर ३ दिवस त्यास पाण्याने स्वच्छ धुवुन साफ केले जाते व संपूर्ण रथास तेलपाणी लावले जाते त्यामुळे रथ चमकदार दिसतो.
रथयात्रा मिरवणुकीचे आदल्या दिवशी रात्री ८.०० वाजता श्री. बालाजी महाराज यांची पालखी गावातून काढली जाते. गावात घराघरातुन सदर पालखीची पुजा केली जाते व श्री. बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले जाते. सदरचा रथ हा सयाजी पाटील परिवार पाचोरा यांचे खाजगी व स्वमालकीचा असून त्याची संपूर्ण देखभाल व व्यवस्था या परिवारामार्फत केली जाते. सयाजी पाटील परिवार हे मुळचे कोल्हापूरचे परंतु कालांतराने ग्रामीण भाषेत कोल्हापूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन कोल्हे असा झाला व कोल्हयांचा रथ म्हणुन ओळखला जाऊ लागला.
रथ मिरवणुकीपूर्वी रथाची पुजा व धार्मिक विधी केला जातो पुजेचा मान पाटील परिवारातील नवविवाहीत जोडप्यास दिला जातो. धार्मिक विधी व दैनंदिन पुजा अर्चा करण्याचा मान हा प्रमोद जोशी यांचे कडेस आहे. पाचोरा येथील राघो गणपत पाटील यांचे घराण्यास देवाचे चोपदाराचा मान आहे. हल्ली त्यांचे नातु प्रा. गिरीष पाटील हे पारंपारीक पोशाखात चोपदाराचे काम पाहतात. रथ थांबविणे, वळविणे यासाठी लाकडी मोगरीचा उपययोग केला जातो. सदर मोगरी लावण्याचे महत्वाचे व जोखमीचे काम हे श्री. अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व त्यांचा सर्व परिवार आनंदाने सहभागी होऊन पार पाडतात. रथापुढे पारंपारीक पध्दतीने मशाल लावल्या जातात सदरचे काम परशुराम अहिरे व त्याचे सहकारी नितीन शिरसाठ यांना देणेत आले आहे. सयाजी पाटील परिवार पाचोरा, मित्र परीवार तसेच पाचोरा शहरातील सर्व भाविक भक्तगण नागरीक यांचे अथक परिश्रमाने सदर रथ यात्रा मिरवणुक आनंदाने व उत्साहाने पार पाडली जाते.