गटारी अमावस्या निमित्ताने गावठी दारु विक्रेत्यांनी कंबर कसली, शेकडो लिटर रसायन गाळून हजारो लिटर दारुची निर्मिती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०७/२०२३
आपल्या मराठी महिन्यानुसार आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावास्या म्हणजे दीपपूजा अमावस्या ही साजरी करण्यामगे काही शास्त्रीय तर धार्मिक संस्कृती जोपासण्यासाठी ही अमावस्या साजरी केली जाते. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे विद्युत पुरवठा नव्हता तेव्हा रात्रीच्यावेळी घरात प्रकाश करण्यासाठी घराघरातून दिवा, कंदील तसेच घरातील देव्हाऱ्यात आरती, समई, निरंजनी वापरत असत. श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जातो कारण याच महिन्यात बरेचसे सण, उत्सव येतात तसेच याच महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याकारणाने ऐनवेळी घरात अंधार नको वेळेवर धावपळ व्हायला नको म्हणून दिवा, कंदील याची साफसफाई तसेच पावसाचे पाणी गावातच साचून घाणीचे साम्राज्य तयार होऊन रोगराई होऊ नये म्हणून ते वाहून जाण्यासाठी गटारींची साफसफाई करणे गरजेचे होते. म्हणून या अमावास्येला गटारी असे संबोधले जात असावे.
परंतु म्हणतात ना “विनाशकाले विपरीत बुद्धी” आपण चार पुस्तक काय शिकलो व एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द शोधून चांगल्या हेतूने आपण साजरी करत असलेल्या या आषाढी अमावस्येला गटारी अमावस्येला आपण दारु, मटन अजून बरेच काही चोचले करत ही गटारी अमावस्या साजरी करत असतो या अमावस्येला अल्पवयीन, तरुण तुर्क, म्हातारे अर्क सगळेच बिनधास्तपणे दारु पिऊन मद्यधुंद अवस्थेत गटारीत पडतात तेव्हाच आम्ही गटारी अमावस्या साजरी केल्याच समाधान होत अशी परिस्थिती आजच्या या युगात दिसून येत आहे.
मग या गटारी अमावस्येला गावागावातून गावठी तसेच देशी दारु विक्रीचा व्यवसाय करणारे या संधीचा फायदा घेत गावागावातून गल्लीबोळात, घराघरात, भररस्त्यावर, धार्मिक स्थळी, शाळा या परिसरातील हॉटेल, टपऱ्या, किराणा दुकान अश्या ठिकाणी बिनधास्तपणे गावठी व देशी दारुची खुलेआम विक्री करतात. याचाच फायदा घेण्यासाठी पाचोरा तालुक्यातील शिंदाड, कुऱ्हाड, लोहारा, वरखेडी, कोल्हे, कळमसरा व नवल वाटण्यासारखे म्हणजे ज्या गावात पोलीस स्टेशन आहे अश्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर गावात सुध्दा अशी अवैध दारुची विक्री केली जाते.
या अवैध दारु गाळणे व विक्रीचा व्यवसाय करणारांना मिळणारे राजकीय तसेच गावागावातील स्वताला प्रतिष्ठीत म्हणून मिरवून घेणारांचे पाठबळ मिळत असल्याने वरील गावातील अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करणारांनी मागील काही दिवसांपासून जंगलातील नाल्या, खोल्यांमध्ये तर काहींनी प्रतिष्ठित म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकांच्या शेत शिवारातील आडोशाला मोह, गुळ, नवसागर, युरीया खत, ऑक्सीटोसीन हे गुरांच्या उपचारासाठी वापरले जाणारे इंजेक्शन व इतर घातक रसायने सडीत घातली असून काल शनिवार दिनांक १५ जुलै २०२३ दुपार पासून जंगल, रानोमळी गावठी दारु गाठण्यासाठी भट्ट्या पेटवल्या असून मोठ्या प्रमाणावर गावठी दारु गाळून ती गावागावातून पोहच करुन विकली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूज कडे नुकतेच प्राप्त झाले आहे.
यामुळे काल गटारी अमावस्या निमित्ताने तळीरामांची चंगळ होणार असून यातुनच गावागावातून, घराघरांतून, रस्त्यावर दारुडे धुमाकूळ घालतील यातुनच भांडण तंटे, अपघात, घराघरात, गावात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून दारुबंदी विभागाने या परिसरातील पोलीस प्रशासनाची मदत घेऊन शरीरासाठी घातक रसायनांचा वापर करुन गाळली जाणारी गावाठी दारु नष्ट करावी कारण या रासायनिक दारु मुळे आजपर्यंत बरेचदा कित्येक लोकांचे बळी गेले असल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
आभारी आहे.
हि बातमी लिहिल्यानंतर मला एका हितचिंतक मित्राचा फोन आला व म्हणाला की शेट तुम्ही अश्या बातम्या लिहून टाकतात म्हणून कटकारस्थान करुन तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात कश्याला रिकामी झंझट.
परंतु आपण या देशाचे नागरिक असल्याकारणाने आपण या देशाचे व समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून मी जनहितार्थ छोटासा प्रयत्न करत असतो एवढेच माझ्याबद्दल आपल्या मनात सद्भावना आहे. हाच माझा ऑक्सिजन समजून मी ही हिंमत करत असतो.