डांभुर्णी, चिंचपुरे, पिंपळगाव हरेश्वर परिसरात बिबट्याची दहशत, पशुधन पालक संतप्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०५/२०२३
(येत्या आठवड्यात बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत)
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, डांभुर्णी, कुऱ्हाड, म्हसास, लोहारा व इतर गाव परिसरात व शेत शिवारात मागील एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आजपर्यंत बिबट्याच्या हल्यात गावागावातील बऱ्याचशा पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.
अशीच घटना आज रात्री डांभुर्णी गावाजवळ घडली असून या घटनेत डांभुर्णी गावाजवळच वरखेडी रस्त्यालगत चतरसिंग झगडू परदेशी यांच्या खळ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून ठार केले आहे. या अगोदरही मागील आठ दिवसात डांभुर्णी येथील अनिल दुलीचंद परदेशी, नितीन बाबुलाल प्रदेश यांच्या खळ्यातील दोन गोऱ्हे बिबट्याने ठार केले आहेत.
तसेच या अगोदर पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या वरसाडे तांडा, कुऱ्हाड, साजगाव, कळमसरा, लोहारा गाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. याबाबत गावागावातील शेतकऱ्यांनी व पशुधन पालकांनी पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार भेटून तसेच भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांना व पशुधनपालकांना उलटसुलट उत्तरे देऊन तर कधी अरेरावीची भाषा करत हाकलून देत असल्याचे गावागावातून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
“वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी चारतात उंटावरून शेळ्या”
एका बाजूला शासन वृक्षलागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन दरवर्षी झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम राबवत असून दुसरीकडे मात्र वनविभागाच्या अर्थपूर्ण आशिर्वादाने शेत शिवारातील तसेच राखीव जंगलासह इतर शासकीय परिसरातील हिरव्यागार वृक्षांची स्वयंचलित यंत्राच्या साह्याने दिवसाढवळ्या खुलेआम कत्तल सुरु असल्याचे दिसून येत आहे. दिवसाढवळ्या होणारी वृक्षतोड सर्वसामान्य नागरिकांना व निसर्गप्रेमींना सहन होत नसल्याने हि वृक्षतोड थांबवण्यासाठी वारंवार आवाज उठवला गेला मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने निसर्गप्रेमींनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
“राखीव जंगलात शिकाऱ्यांचा धुमाकूळ”
पाचोरा, जामनेर व सोयगाव तालुक्याला राखीव जंगलाची एक नैसर्गिक देणगी मिळाली आहे. मात्र या राखीव जंगलाकडे लोकप्रतिनिधी, वनमंत्री यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने हिच संधी साधून वनविभागाचे काही अधिकारी व कर्मचारी (सगळेच नाही) मोठ्या प्रमाणात हप्ते घेऊन स्वताच चांगभलं करुन घेत असल्यामुळे लाकुड व्यापारी व वन्य प्राण्यांची शिकार करणारांनी राखीव जंगलात अक्षरशा धुमाकूळ घातला असल्याकारणाने जंगलातील बिबट्या, हरण, रानडुकरे, माकडांनी आपला मोर्चा गाव शिवाराकडे वळवला असल्याने बिबट्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
“शेतकऱ्यांना उर्मट भाषेत उत्तर”
सद्यस्थितीत वरील गाव व शेत शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दर दोन दिवसाआड पाळीव प्राण्यांची शिकार करत आहे. बिबट्याने हल्ला चढवून पाळीव प्राणी ठार झाल्यानंतर पशुधन पालक व मालक घडलेला प्रकार सांगण्याकरीता पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधतात तेव्हा त्यांना समर्पक उत्तर मिळत नसल्याने ते पाचोरा वनविभागाचे कार्यालयात जातात परंतु तेथे रिकाम्या खुर्च्या दिसून येते आहेत. तसेच चुकून एखाद्यावेळेस एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी फोन घेतलाच तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करा असे सांगितले जाते मात्र सगळ्याच शेतकऱ्यांकडे चांगले मोबाईल नाहीत व ज्यांच्याकडे आहेत त्यांना ते हाताळता येत नसल्याने ऑनलाईन तक्रार दाखल करणे शक्य होत नसल्याचे शेतकरी सांगतात म्हणून पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना वरिष्ठांनी तसेच लोकप्रतिनिधींनी योग्य समज द्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.