गायरान जमिनी धनदांडग्यांच्या घशात, दुभती जनावरे कत्तलखान्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२२
राज्यातील लाखो व्यक्तींनी शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. महसूल विभागाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. पण, २५-३० वर्षांपासून त्याठिकाणी राहणाऱ्यांना तेथून हाकलणे कठीण असल्याने आता त्याचठिकाणी गावठाणचे पट्टे तयार करून त्यांची जागा अधिकृत करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु गायरान जमिनी कायमस्वरूपी ठेवून गाव विस्तारासाठी गावाजवळील शेत जमीन अधिग्रहण करून त्या जागेवर बेघर लोकांना घरे देण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
हा निर्णय गोरगरिबांच्या हितासाठी घेण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी बऱ्याचशा ठिकाणी या गायरान जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असल्याचे दिसून येते विशेष म्हणजे ज्यांनी, ज्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. अश्याच बऱ्याचशा लोकांच्या नावावर स्व मालिकेची घरे, दारे, मोठमोठे बंगले व शहरी भागातील वस्त्यांमध्ये घरे बांधलेली आहेत.
परंतु एका बाजूला गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल विभागाने नोटीस बजावल्या आहेत. तर दुसरीकडे आपापले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मतदानाच्या पेट्या कश्या भरता येतील व आपल्यामागे आपला जयजयकार करणाऱ्या कार्यकर्त्यांना कसे खुश ठेवता येईल याकरिता गायरान जमिनीवर अतिक्रमणच नव्हे तर असे बरेचसे विषय कायदा मोडित काढून गोरगरिबांच्या नावाखाली व जनहितार्थ हा निर्णय घ्यावा लागला असा देखावा तयार करुन स्वताची पोळी भाजून घेतली जात आहे.
मात्र या गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करायचा निर्णय झालाच तर गावकुसाबाहेर असलेल्या गायरान जमिनीवरील कुरणे नष्ट होतील व या घातक निर्णयांमुळे भविष्यात खूपच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण की आताच गायरान जमिनीवरील अतिक्रमण वाढल्याने गुरेढोरे चारण्यासाठी कुरणे नसल्याने दुभत्या गायी, म्हशी व गोरगरिबांची गाय म्हणजे शेळ्या (बकऱ्या) पाळणे मुश्किल झाले आहे.
यामुळे भूमिहीन, शेतमजूरांचा गुरेढोरे पाळण्याचा जोड व्यवसाय ठप्प झाला असल्याने दुभत्या जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहेत. तसेच आता यांत्रिक पद्धतीने शेती केली जात असल्याने शेतकरी बैलजोड्या पाळत नसल्याने ही जातिवंत जनावरे कत्तलखान्यात रवाना होत असून आपल्या मुलाबाळांना आपण आज जसे सिंह, वाघांचे चित्र दाखवून प्राण्यांची ओळख करुन देत आहोत अशीच ओळख भविष्यात भावी पिढीला गाय, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांची करुन द्यावी लागते की काय अशी शंका मनात निर्माण होते.
महत्वाचा विषय म्हणजे गायरान जमिनीवरील अतिक्रमण वाढल्याने गुरेढोरे चारण्यासाठी पशुपालक हे राखीव जंगलाकडे वळले व मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहेत. यामुळे राखीव जंगलं नष्ट होत चालली आहेत. जंगले सुरक्षित राहीली नाहीत म्हणून जंगलातील बिबट्या, तडस, निलगाय (रोही), रानडुक्कर, हरणांचे कळप शेती शिवारात व मानव वस्तीकडे वळले आहेत. यामुळे आपल्या महाराष्ट्रात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात बऱ्याचशा लोकांनी आपला जीव गमावला आहे.
म्हणून सर्वच बाबींचा विचार करुन गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण त्वरित काढून त्या, त्या ठिकाणी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी निसर्गप्रेमी, पशुधन पालक व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.