लोहटार गावात वृध्द दांपत्याने विषारी औषध सेवन करुन घेत घेतला जगाचा निरोप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०७/२०२३
आपल्या हिंदू संस्कृतीत विवाह पद्धति म्हणजे पवित्र सोहळा मानला जातो. या विवाह सोहळ्यात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व अग्नीच्या साक्षीने दोन उभयतांची जन्मगाठ बाधली जाते व याच ठिकाणी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून देवाला साकडे घालण्यात येते तसेच वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करुन आपल्या पतीला दिर्घायुष्यासाठी देवाला साकडे घातले जाते. सुखदुखात एकजीव होऊन पतीपत्नी सुखाचा संसार करत “साथ जियेंगे, साथ मरेंगे” अशी भावना उराशी बाळगून जीवन जगत असतात परंतु याच संसारात उभयतांना जगणे नकोसे होऊन आत्महत्या करण्याची वेळ येते ही बाब म्हणजे आजच्या काळात मानव जातीला विचार करायला लावणारा बाब आहे.
अशीच एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे एक घटना पाचोरा तालुक्यातील लोहटार या गावात घडली असून वृद्ध दाम्पत्यांनी कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना दिनांक १० जुलै २०२३ सोमवार रोजी उघडकीस आल्याने पाचोरा तालुक्यासह लोहटार गाव, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील एस. टी. महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय-७८) यांना सुरुवाती पासूनच अध्यात्माची आवड होती. महामंडळातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ईश्वर पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (वय-७२) हे नियमित देवपूजा करुन अध्यात्मिक मार्गावर चालत आपले जीवन जगत होते.
परंतु या दोघांच्या आयुष्यात असा कोणता कठीण प्रसंग आला की त्यांनी दिनांक ८ जुलै २०२३ शनिवार रोजी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिस स्टेशनला फोन करुन मी लोहटार येथुन ईश्वर पाटील बोलतोय अस सांगत मी व माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, आमच्या आत्महत्येस कोणासही कारणीभूत धरु नये अशी माहिती पोलिस स्टेशनमध्ये दिली हे फोनवरचे हे संभाषण कानी पडताच संबंधित पोलीसाच्या पायाखालची वाळू सरकली व अंगावर काटा उभा राहिला त्यांनी लगेचच आलेल्या फोन बद्दल आपल्या सहकाऱ्यांना सांगून त्यांना सोबत घेत लोहटार गावी ईश्वर पाटील यांचे घर गाठले.
घरी पोहचायला पाहीले तर ईश्वर पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई पाटील यांनी कोणतेतरी विषारी औषध घेतले असल्याचे लक्षात आले. ही परिस्थिती पाहून पाचोरा पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता वृध्द दांपत्यांना पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अथक परिश्रम घेत या दोघ दांपत्यांवर उपचार करुन त्यांना वाचवले होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते असेच म्हणावे लागेल कारण प्रकृती धोक्याबाहेर असतांनाच दिनांक १० जूलै २०२३ सोमवार रोजी सकाळी पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्रकृती अचानकपणे खालावली व काही क्षणातच प्रमिलाबाई यांनी व या घटनेच्या काही वेळानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी या जगाचा निरोप घेतला.
या दोघांच्या मृत्यूची बातमी पाचोराचे शहरासह लोहटार गावापर्यंत व संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच सगळ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेत दोघांचे मृतदेह पाहून हळहळ व्यक्त केली.
(मयत ईश्वर पाटील व प्रमिला बाई पाटील हे आध्यात्मिक जीवन जगत असतांनाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले व विशेष म्हणजे आपली जीवनयात्रा संपवण्याआधी पोलीस स्टेशनला फोन करुन याची कल्पना देत आमच्या मृत्यूला कोणालाही कारणीभूत किंवा जबाबदार धरु नये असे सांगितले यावरुन या वृद्ध दांपत्याच्या वाट्याला अशी वेळ का ? आली हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.)