माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांची भुमिका तळ्यात, मळ्यात, भावी आमदाराची माळ टाकवी कुणाच्या गळ्यात. जनतेच्या मनातील प्रश्न ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०७/२०२३
सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची उलथापालथ झाली असून अगोदर सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतून उभी बंडखोर करत पळून गेलेले आमदार यांचे सरकार होते. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. श्री. अजितदादा पवारांनी अचानकपणे राष्ट्रवादीला खिंडार पाडून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकारसोबत हातमिळवणी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे.
याच राजकीय वादळवाऱ्यात मात्र निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांची फरफट होतांना दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आजी, माजी मंत्री, आमदार, खासदार हे मा. श्री. अजितदादा पवारांसोबत आहेत. तर काही जागेवर थांबले असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असलेली सर्वसामान्य जनता आज द्विधा मनस्थितीत असून आपण नेमके काय करायचे या विचारात आहेत. कारण एका बाजूला सगळ्यांचे आदराचे स्थान म्हणून ओळखले जाणारे (काका) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. श्री. शरदचंद्रजी पवार तर दुसऱ्या बाजूला यांचेच (पुतणे) ज्यांनी नुकतीच राष्ट्रवादीत उभी फट पाडून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेशी हातमिळवणी केली हे असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी काकांसोबत रहातात की पुतण्यासोबत जातात याकडे सर्वसामान्य जनता लक्ष ठेवून आहेत.
याच कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यावर पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पहिल्यांदा मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या निष्ठावंत भूमिकेचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात होते. परंतु नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काल दिनांक ०९ जूलै २०२३ रविवार रोजी त्यांनी त्यांच्या जळगाव येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते कारण अजितदादा पवार यांच्या सोबत कोण, कोण उभे रहातात हे या बैठकीतून दिसून येणार होते. या बैठकीत जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. व याच बैठकीला पाचोरा, भडगाव तालुक्याचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ हे ही उपस्थित असल्याचे दिसून आल्यावर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात आहेत. कारण अगोदर मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांची भेट व लगेचच फुटीरवादी गटातील मा. श्री. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिलेली हजेरी ह्या दोघंही घटना सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणाऱ्या असुन माजी आमदार वाघ हे हितसंबंध जोपासतात की आलेल्या (क्षणीक) संधीचा फायदा घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
म्हणून माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महत्वाचे ~
अजितदादा पवारांनी बंडखोरी व संख्याबळ म्हणजे डालक्या खाली झाकलेल्या कोंबडी सारखे आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जेव्हा बंडखोरी करुन भारतीय जनता पक्षाशी एकी केली तेव्हा त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या व आलेल्या आमदारांच्या नावाची यादी जाहीर केली होती.
मात्र आता अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकार सोबत हातमिळवणी करतांना ३९ ते ४० आमदार माझ्या सोबत असल्याचेही जरी सांगितले असले तरी अद्यापही त्यांनी सोबत असलेल्या आमदारांची नावे स्पष्टपणे जाहीर केले नसल्याने एक प्रकारे डालक्या खाली कोंबडी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. डालके उघडल्यावर कोंबडी अंडे देणारी आहे किंवा नाही हे सिद्ध होईल हे मात्र तेवढेच खरे.
कारण दुसरीकडे मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब अमळनेर येथे आले असता हजारो चाहत्यांनी त्यांची भेट घेतली व आजही त्यांच्याकडे येऊन भेटणारे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संख्या पाहिली तर नक्कीच आजह मा. श्री. शरदचंद्रजी पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पितामह आहेत हे दिसून येते.
(माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्याकडे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनता वाघ हे आमचे भावी आमदार असतील अशी स्वप्ने रंगवतांना दिसून येत असून मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी समंजसपणे आपली भूमिका घ्यावी व ती जाहिर करावी अशी मागणी जोर धरत आहे.)