कुऱ्हाड व सांगवी येथील पोलीस भरती झालेल्या युवकांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिल्या शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील आकाश देवीदास कदम, महेंद्र संजय माळी यांची मुंबई पोलीस व नितीन खेडेकर याची पुणे पोलीस दलात तसेच सांगवी येथील अमोल ज्ञानेश्वर पाटील याची मुंबई पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली असून गोपल अरुण पाटील याची एअर इंडिया फोर्स मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या तरुणांनी अत्यंत बिकट परिस्थितीत मेहनत घेऊन अभ्यास करत पोलीस दलाच्या घेतलेल्या परिक्षेत यश मिळवले होते म्हणून यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या पोलीस खात्यात व एअर इंडिया एअर फोर्स मध्ये भरती झालेल्या युवकांचा सत्कार करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी पाचोरा तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी सांगवी व कुऱ्हाड गावी भेट देऊन आकाश देवीदास कदम, महेंद्र संजय माळी, नितीन खेडेकर, गोपाल अरुण पाटील व अमोल ज्ञानेश्वर पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कुऱ्हाड व सांगवी येथील तरुणांनी बिकट परिस्थितीत मोलमजुरी करत तर एका तरुणाने पाव, वाड्याच्या व्यवसाय करुन अथक परिश्रम करुन रात्रंदिवस अभ्यास करत “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद घेऊन राष्ट्राची, जनतेची व समाजाची आयुष्यभर सेवा करण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेण्याचा जो विडा उचलला आहे. खरच ही ग्रामीण भागातील तरुणांची जिद्द व संघर्ष वाखाण्याजोगा आहे. आज संपूर्ण भारतात पोलीसांचे कामकाज व त्याग महत्वाचा आहे. पोलीस आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून यात्रा उत्सव असो, मोर्चा असो, धार्मिक उत्सव असो यावेळी उन, वारा, पाऊस याची पर्वा न करता कायमस्वरूपी आपले रक्षण करण्यासाठी सज्ज असतात म्हणून आपण सुरक्षित आहोत तसेच संकटसमयी अगोदर आपण देवाचा धावा करतो परंतु काही क्षणातच पोलीस हे देवदूत म्हणून लगेचच धावत येतात असे मत सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी व्यक्त करत या तरुणांनी देशाविषयी स्वाभिमान बाळगून देशसेवा करावी असे आवाहन केले.
या सत्कार समारंभाचे वेळी मा. श्री. अरुण भाऊ पाटील, अधिकार पाटील, शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कुऱ्हाड व सांगवी गावातील ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येनेने उपस्थित होते.