शेंदूर्णी ते मालखेडा रस्त्यावर लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी खड्डे चुकवा व बक्षीस मिळवा स्पर्धांचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०५/२०२३
[रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे.]
—————————————-
पाचोरा ते जामनेर महामार्ग क्रमांक १९ हा रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून याच रस्त्यावरून मराठवाडा, मुक्ताईनगर व मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या तसेच मुंबई, सुरत कडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावरून दररोज शेकडो नव्हे तर हजारो वाहनांसह रुग्णवाहिका व कायदा, सुव्यवस्थेची धुरा सांभाळणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांसह एखाद्यावेळेस कुठे आग लागल्यास अग्निशमन बंब याच रस्त्यावरून धावत असतात.
मात्र याच पाचोरा ते जामनेर महामार्ग क्रमांक १९ वर मागील तीन महिन्यांपासून मालखेडा ते शेंदुर्णी दरम्यानच्या अंदाजे साडेतीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला तरीही आजपावेतो या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे.
तसेच ज्या, ज्या लोकप्रतिनिधींनी मते मागतांना गावागावात जाऊन चांगले रस्ते व इतर सुखसोयी देण्याची आश्वासन दिली होती त्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या रहदारीला घातक ठरणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी संबंधित विभागाला सुचना केल्या नसल्याने अत्यंत निर्ढावलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नसल्याप्रमाणे डोळे असून आंधळ्याची भूमिका घेतली आहे.
विशेष म्हणजे या रस्त्यावरुन ॲम्बुलन्स मधून रुग्णांना रुग्णालयात नेत असतांना रस्ता खराब असल्यामुळे दवाखान्यात नेण्यासाठी उशीर होतो तर ॲम्बुलन्स मधील रुग्णाला त्याच्या शारीरिक व्याधीपेक्षा जास्त त्रास या रस्त्यातील खड्ड्यांमुळे होतो व तेव्हा उपचारापेक्षा आजार बरा असे सांगून रुग्ण गाडी थांबवण्याची विनंती करतो असे अनुभव काही अंबुलन्स चालकांनी सत्यजित न्यूज कडे सांगितले आहेत.
तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस विभागासह अत्यंत तातडीच्या कामासाठी बाहेरगावी जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच एस. टी. बसने प्रवास करणाऱ्या व खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून मालखेडा ते शेंदुर्णी दरम्यानच्या रस्त्यावरुन प्रवास करतांना एस की. तील प्रवासी बसलेल्या आसनावरुन उठून उभे राहून प्रवास करणे पसंत करत आहेत.
म्हणून मालखेडा ते शेंदुर्णी दरम्यानच्या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याची लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची जाणीव व्हावी म्हणून सत्यजित न्यूजच्या माध्यमातून लवकरच खड्डे चुकवा व बक्षीस मिळवा ही फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी जामनेर तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे तारणहार मंत्री माननीय श्री. गिरीशभाऊ महाजन यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याने त्यांची तारीख मिळताच स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ही विनंती.
(कांदा कापला म्हणजे डोळ्याला पाणी येत, परंतु कांदा कापल्याशिवाय भाकरी गोड लागत नाही हेही तितकेच खरे)
(ही बातमी सर्वसामान्य जनतेने सत्यजित न्यूजकडे आपली कैफियत मांडली म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी व कुंभकर्ण झोपेत असलेल्या शासन, प्रशासनाला जागे करण्यासाठी घेतली आहे. यात काही चुकीचा ठरेल असा मजकूर असल्यास क्षमस्व)