आखाजीच्या सणानिमित्ताने घागर पूजनाची प्रथा अजूनही कायम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०४/२०२३
भारतीय संस्कृतीत (अक्षयतृतीया) आखाजी हा खुप महत्वाचा सण माणला जातो या सणाला पितरांची म्हणजे आपल्या परिसरातील मयत झालेल्या लागवडीलांच्य आत्मा तृप्तीसाठी त्यांना डेरगं (घागर) भरुन पूजन करत मिष्ठान्न भोग दाखवून श्राध्द पूजन करतात यानिमित्ताने कुंभार बाधव यांनी पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली घागर व लोटा विक्रीसाठी आपली दुकाने थाटली होती.
आखाजी हा सण स्त्री-पुरुष, आबालवृद्धांचा जसा मौजमजा करण्याचा दिवस आहे. तसाच तो आपल्या पूर्वजांना, पितरांना श्राद्धविधी करून स्मरण्याचा दिवस आहे. श्राद्ध पूजन हे खान्देशात दोन प्रकारचे आढळते, ज्यांचे आई किंवा वडील वारले ते पहिल्या वर्षी जे श्राद्ध घालतात त्यास ‘डेरगं पूजन’ असे म्हणतात, तर ज्याच्या आप्ताच्या मृत्यूला एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे ते ‘घागर पूजन’ या नावाचे श्राद्धविधी पार पाडतात. डेरगं आणि घागर ही दोनही सारख्याच आकाराची भाजलेली मातीची भांडी. डेरगं या मडक्याला तेलरंग दिलेला असतो. अशी डेरगी, लोणचे घालण्यासाठी खान्देशात सर्रास वापरली जातात.
या श्राद्ध पूजनात त्या मातीच्या मडक्यात पाणी भरू न त्यावर पाण्याने भरलेला मातीचा लोटा ठेवतात. या नव्या मडक्याच्या कडांवर सुताचे पाच पाच वेढे गुंडाळतात, त्यात पूर्वीच उगवून ठेवलेल्या गव्हाच्या हिरव्या-पिवळ्या रोपांचे पाच पाच जुडगे उभे ठेवतात व वरून दोरा गुंडाळतात. हे मडके मातीच्या चार ढेकळांवर ठेवतात. त्या मडक्यांवर सांजोरी व नैवेद्य ठेवून पूजा करतात. अग्नीत नैवेद्याचे हवन करतात. त्यास आगारी टाकणं असे म्हणतात. त्यानंतर पंगतीत जेवायला बसलेल्या मुद्दाम निमंत्रित केलेल्या जातीतल्या, पण दुसऱ्या कुळातल्या विवाहित असलेल्या पुरुषाची पूजा करतात. त्यास ‘पितर’ म्हणून संबोधतात. लहान मुले, वृद्ध यांनादेखील अशा पूजेपूर्वी अन्न उष्टे करू दिले जात नाही. अशा प्रकारे या सणानिमित्ताने प्रत्येकाच्या मनात पितरांची स्मृती जागृत होते असे मानले जाते.