वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरु करण्यात यावा, पशुधन पालकांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२२
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या उपबाजार समिती वरखेडी येथे प्रत्येक गुरुवारी गुरांचा बाजार भरतो वरखेडी येथील गुरांचा बाजार हा जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, गुजरात राज्यातही प्रसिद्ध असल्याकारणाने लांब, लांबून जातिवंत गुरेढोरे खरेदी, विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग येत असतो.
परंतु मागील काही महिन्यांपासून गाय, बैल म्हणजे गोवंशिय पशुधनाला जळगाव जिल्ह्यात लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. म्हणून इतर सुदृढ पशुधनाला या आजाराची लागण होऊ नये म्हणून जळगाव जिल्ह्यातील गुरांचे भरणारे आठवडे बाजार, बैलांच्या तसेच गाडी बैलांच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तसेच धडक मोहीम राबवून लसीकरण करण्यात आले असल्याने आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात लम्पी आजार आटोक्यात आल्याचे दिसून येत असून आता गुरांचा बाजार भरवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी पशुधन पालक व व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.
गुरांच्या बाजारात गाय, बैल विक्री करण्यासाठी बंदी असल्याकारणाने कोरडवाहू शेती करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक उलाढाल करण्यासाठी बैलजोडी विकणे गरजेचे आहे. तसेच दुभत्या गायींची खरेदीविक्री मोठ्या प्रमाणात थांबल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पशुधन पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे याच मजबुरीचा फायदा घेत काही व्यापारी गावागावात फिरून जातिवंत गुरांची मातीमोल भावाने खरेदी करुन पशुधन पालकांची लुट करत आहेत.
तसेच याच गुरांच्या बाजारात दोरखंड, जोते, चऱ्हाट, गुरांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू व साहित्य, वेळुच्या काड्या, उपहारगृह, हॉटेल, चहाची दुकाने, शेती अवजारे विक्रेत्यांची दुकाने याच बाजारातील व्यवहारांवर अवलंबून असल्याने या व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे गावागावातून चोरी, छुपे पशुधन खरेदी केल्यानंतर बाजार बंद असल्याने ही जातिवंत जनावरे मोठ्या प्रमाणात कत्तलखान्यात नेऊन विकायचा धंदा तेजीत असल्याने जातिवंत पशुधन झपाट्याने कमी होतांना दिसून येत आहे. तसेच गुरे ढोरे चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. म्हणून लवकरात, लवकर गुरांचा बाजार भरवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.