राष्ट्रवादी सुरू करणार जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२२

पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात पोहचून स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी आणि पक्ष बळकटीसाठी जनसंवाद यात्रा सुरू करणार आहेत.

२ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून श्री. क्षेत्र कनाशी या तिर्थक्षेत्री सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. एकनाथरावजी खडसे, मा. श्री. रवींद्र पाटील, मा. श्री. गुलाबराव देवकर, माजी आमदार मा. श्री. सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे.

या यात्रेदरम्यान टप्प्याटप्प्याने मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत जाऊन देशाचे नेते मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांचे विचार पोहचविण्यासोबतच व राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी माजी आमदार मा. श्री. दिलीप वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आघाडी सरकारने मागील काळात शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, जनसामान्यांसाठी घेतलेले निर्णय व विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

या दरम्यान गावातील स्थानिक समस्या जाणून घेण्याचासुद्धा मा. श्री दिलीप वाघ यांचा मानस आहे. याशिवाय येणाऱ्या विविध निवडणुकांसाठी देखील सामान्य कार्यकर्त्यांसोबतच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मा. श्री. संजय वाघ यांनी दिली. जनसंवाद यात्रेत पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार असून या निमित्ताने शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या