लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे उन्हाळी बाल संस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०५/२०२२
सध्याच्या परिस्थितीत मोबाईल, टी. व्ही. मोबाईल क्षणात उपलब्ध होणारे चित्रपट, अजून असेल, नसेल त्या वेबसाइट उपलब्ध असल्याने बालवयातील मुलांपासून तर तरुणवर्ग मोबाईलच्या आहारी गेला आहे. या कारणांमुळे आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला असून गीता पाठ, हनुमान चालीसा, रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम, हरिपाठ, ज्ञानेश्वरी गायन यांच्यापासून अल्पवयीन व तरुणवर्ग दुर जात असून याचे वाचन, पठण, नामस्मरण तसेच अनुकरण होत नसल्याने अल्पवयीन मुले व तरुण पिढी वाममार्गाला जात आहे. हा विषय लक्षात घेऊन लहान बालकांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने मागील तीन वर्षांपासून उन्हाळी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करत आहे.
यावर्षीही लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने पाचोरा शहरात गेल्या अकरा दिवसांपासून उन्हाळी बाल संस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा समारोप नुकतीच करण्यात आला. या शिबिरात गेल्या अकरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना अध्यात्मिक, सामाजिक व तसेच बौद्धिक मार्गदर्शन करण्यात आले. यात सकाळी उठल्यापासून योगासने, गीता पाठ, हनुमान चालीसा, रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम हरिपाठ, ज्ञानेश्वरी गायन, पखवाज वादन आदी विषयांचं मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना समाजात कसे वागावे, संस्कारशील जीवन कसे असावे, माता-पित्यांचा आदर तसेच थोरामोठ्यांचा आदर कसा राखावा हे शिकविण्यात आले.
समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी अकरा दिवसात प्राप्त केलेल्या गुणांचे प्रकटीकरण केले. यात हनुमान चालीसा, गीतेचे श्लोक, गवळण, भजन म्हणून आपण आत्मसात केलेल्या कलेचे सादरीकरण केले. सादरीकरण सुरु असतांनाच उपस्थित सर्व मान्यवर व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलांचे भरभरून कौतुक केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाजातील गरीब, अनाथ मुलांना वर्षभर वारकरी शिक्षण, धार्मिक शिक्षण यासह शालेय शिक्षण विनामूल्य देण्यात येत असून जी मुलं वर्षभर राहू शकत नाही अशा मुलांसाठी लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने उन्हाळी बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले होते
हे शिबिर संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता ताई पाटील व त्यांचे पती भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर तसेच संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय रमेशजी मोरे यांनी आयोजित केले होते. शिबिरासाठी अन्नदान व इतर मदत गावातील नागरिक, तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांचे सहकार्य लाभले. या अकरा दिवसांच्या शिबिरात शिक्षण घेतांना तसेच निरोप समारंभाच्या वेळी शिबिरात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू रुपाने प्रेम, जिव्हाळा व आपुलकी दिसून येत होती.
शिबिराचे समारोपाच्या दिवशी शिबिरार्थींना जातांना मा. श्री. रमेशजी मोरे यांच्यातर्फे प्रमाणपत्र व एक वॉटर बॅग भेट म्हणून देण्यात आली. हे शिबिर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा सेवाभाव मनात ठेवून निशुल्क घेण्यात आले होते. या शिबिरात जवळपास १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापुढे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे हिवाळी व उन्हाळी असे दोन टप्प्यांत शिबिर घेण्यात येणार असून जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा. श्री. रमेशजी मोरे, कथा भागवताचार्य मा. श्री. योगीजी महाराज व आदरणीय सुनीताताई पाटील यांनी केले आहे.
फक्त सेवा हा भाऊ मनात ठेवून शिबिराचे आयोजन केले होते म्हणून शिबिरामध्ये जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असेच शिबिर भविष्यात देखील पाचोरा शहरामध्ये उन्हाळी हिवाळी अशा दोन टप्प्यांमध्ये होतील असे आवाहन आदरणीय रमेशजी मोरे कथा भागवताचार्य योगीजी महाराज व सुनीताताई पाटील यांनी केले आहे.