कुऱ्हाड बुद्रुक येथील गटारी तुडुंब भरल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०४/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील गटारी तुडुंब भरल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कुऱ्हाड येथील मुख्य रस्ता व बौद्ध वाडा परिसरात जीर्ण झालेल्या गटारी मध्ये सांडपाणी, शौचालयाचे पाणी व कचरा साचल्याने निचरा न होत गटारी हे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा उपद्रव वाढला असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दुर्गंधी व डासांमुळे घराघरातील काही व्यक्ती व विषेशतः लहान मुले आजारी पडत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करुन सुध्दा, ग्रामपंचायतीचे सत्ताधारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तरी लवकरात लवकर या प्रश्नांकडे लक्ष वेधून परिसरातील रहिवाशांची समस्या कायमची सोडविण्याची मागणी जोर धरत आहे.
(या समस्या संदर्भात कुऱ्हाड बुद्रुक तांडा येथील सरपंचांना विचारले असता त्यांनी, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी पडलेला असून या पैशांमध्ये गावातील गटारी व स्वच्छतेचे काम करायचे असल्याने, मासिक बैठकीत सत्ताधारींची कोरम संख्या पूर्ण होत नसल्याने निधी उपलब्ध असल्यावरही या विकास कामासाठी तांत्रिक अडचणी आणत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी आम्ही आहोत परंतु विरोधक हेतुपरस्कर आम्हाला त्रास देण्यासाठी वेठीस धरत असल्याचे सरपंच मा.श्री. उदेसिंग राठोड यांनी सत्याजित न्यूजशी बोलतांना सांगितले.)