कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी, कर्मचारी व अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण डोळे झाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२१
विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत चोरी कळवा आणि बक्षीस मिळवा अशी मोठ्या दिमाखात जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात मात्र विद्यूत चोरीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना मात्र वेगळाच अनुभव येत आहे. कारण कुऱ्हाड बुद्रुक सह पाचोरा तालुक्यातील गावागावात व शेती शिवारात विद्यूत वाहिन्यांवर आकोडे टाकून विद्यूतचोरी दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. म्हणून विद्यूतचोरी होत असल्याचे संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्षात आणून दिल्यानंतर सुध्दा विद्यूतचोरी करणारांवर कोणतीही ठोस कारवाई करुन कायमस्वरूपी विद्यूतचोरी थांबवली जात नसल्याने अधिकृत विद्युत ग्राहकांना कमी दाबाचा विद्युत पुरवठा मिळत असून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तसेच वाढीव बिलासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता विद्यूतचोरी सुरु असल्याचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून दिले तरी कारवाई होत नाही. यामागील एकमेव कारण म्हणजे संबंधित (काही) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विद्यूतचोरी करणारांशी आर्थिक लागेबांधे असल्याची खमंग चर्चा कुऱ्हाड बुद्रुक गावासह पाचोरा तालुक्यात सुरू आहे.
आकोडे टाकून विद्यूतचोरी होत असल्याने सद्यस्थितीत शेतकरी बांधवांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यूत वितरण कंपनीच्या मनमानी पणाने शेतकऱ्यांना कधी दिवसा तर कधी रात्रीच्या वेळेस ठरावीक वेळासाठी विद्यूत पुरवठा केला जातो. तोही कमी अश्वशक्तीने म्हणजे कमी दाबाने विद्यूत पुरविण्यात येत आहे. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार व क्षमतेनुसार शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर (डी.पी) दिली जाते.
परंतु ज्या ट्रान्सफॉर्मर वर पंधरा अधिकृत ग्राहक असतात, त्या ट्रान्सफॉर्मर वर अजून १५ ते २० शेतकरी अकोडे टाकून विद्युत चोरी करत असतात. या कारणामुळे विद्युत पुरवठा विभागला जाऊन अतिशय कमी दाबाने विद्युतपुरवठा मिळत असल्याने पिकाला पाणी भरणे शक्य होत नाही. तसेच विद्युत पंप कमी दाबाचा विद्युत पुरवठा मिळत असल्याने जळून खाक होतात. तर कधीकधी ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेपेक्षा जास्तीच्या विद्यूत प्रवाहाची उचल झाल्याने ट्रान्सफॉर्मर जळून खाक होतो. असे झाल्यास नवीन ट्रान्सफॉर्मर मीळेपर्यंत पीकांना वेळेवर पाणी भरले जात नाही व उत्पन्न घटते व नवीन ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी हजारोने पैसे खर्च करावे लागतात. या प्रकाराने तसेच अधिकृत विद्युत ग्राहकांनी रीतसर डिमांड नोट भरून, येणारे विद्युत बिल वेळेवर भरून सुद्धा जर चोरट्यांमुळे हातात येणारे पीक वाया जात असेल तर त्याला जबाबदार विद्युत वितरण कंपनी आहे. असे शेतकऱ्यांचे ठाम मत आहे.
असाच काहीसा प्रकार कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शिवारातील ट्रान्सफॉर्मर वर सुरू असून येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी या विद्यूत चोरांवर कारवाई होण्यासाठी अर्ज केले होते. परंतु कारवाई न झाल्याने यावर्षीही या भैरवनाथ बाबा शिवारातील ट्रांसफार्मर आजही १५ ते २० शेतकरी आकोडे टाकून वीज चोरी करत असल्याने या शिवारातील डिमांड नोट भरून विद्युत कनेक्शन घेतलेल्या अधिकृत विद्युत ग्राहकांनी सुरु असलेली विद्यूतचोरी थांबवण्यासाठी पाचोरा व वरखेडी येथील संबंधित अधिकारी यांच्याकडे अर्ज केले आहेत. परंतु याच विद्युत कंपनीचे (काही) अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या विद्युत चोरांशी असलेल्या आर्थिक देवाणघेवाणीतून या विद्यूतचोरीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत विद्यूतचोरी कायमस्वरूपी थांबवण्यासाठी वैतागलेल्या शेतकऱ्यांनी एक निवेदन संबंधित अधिकारी यांच्याकडे दिले असून निवेदनावर राजमल राठोड, राजू सखाराम वंजारी, बध्दू समसेद शेख, अशोक सुपडू देशमुख, गणेश वंजारी या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.